बदलापूरहून फक्त अर्ध्या तासात गाठता येणार नवी मुंबई
ठाणे, दि. २० : ठाणे जिल्ह्यातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या बदलापूर-अंबरनाथ मधील नागरिकांचा प्रवास गतिमान होण्यासाठी कासगाव-कामोठे नव्या रेल्वे मार्गाच्या फायनल लोकेशन सर्व्हेला केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली आहे. बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी नुकतीच नवी दिल्लीत अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली.या भेटीत नव्या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षणाला मंजुरी देण्यात आलीय.या नव्या रेल्वे मार्गामुळे बदलापूरहून नवी मुंबईला अवघ्या 30 मिनिटांत जाता येईल.
बदलापूर आणि अंबरनाथ येथील नागरिकांना नवी मुंबईला जाण्यासाठी ठाणे मार्गे रेल्वेने प्रवास करावा लागतो. या प्रवासासाठी जवळपास दीड तास लागतो. त्यामुळे वांगणी आणि बदलापूरच्या दरम्यान कासगाव रेल्वे स्थानक तयार करून कासगाव-कामोठे नवा रेल्वे मार्ग तयार केल्यास हे अंतर अवघ्या अर्ध्या तासांत पार करता येणं शक्य आहे. तशी मागणी माजी नगराध्यक्ष राम पातकर यांनी लावून धरली होती.
हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यावर याचा फायदा वांगणी, बदलापूर अंबरनाथ तसेच उल्हासनगर पर्यंतच्या प्रवाशांना होऊन वेळेत मोठी बचत होईल असा विश्वास पातकर यांनी व्यक्त केला आहे.