ठाण्यात “जय श्रीराम” वाला महापौर बसवा नाही तर, हिरवे गुलाल उधळतील !
मंत्री नितेश राणे यांचा सावधानतेचा इशारा
भाजप-शिवसेना- रिपाई महायुतीचे सीताराम राणे, परिषा सरनाईक आणि जयश्री डेव्हीड यांच्या प्रचार रॅलीत जोरदार शक्ती प्रदर्शन
ठाणे, 13
एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि दुसरीकडे धर्माच्या नावाने मतदानाचे फतवे काढायचे, ह्या व्होट जिहादचा पर्दाफाश आम्ही केला आहे. तेव्हा, राष्ट्रभक्त हिंदु समाजाने १५ तारखेला जागरूक राहुन मतदान करावे, आणि ठाण्यात “जय श्रीराम” वाला महापौर बसवावा, नाही तर हे हिरवे गुलाल उधळतील. असा सावधानतेचा इशारा राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे.
ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ चे भाजप – शिवसेना – रिपाई महायुतीचे उमेदवार सीताराम राणे, परिषा सरनाईक आणि जयश्री डेव्हीड यांच्या प्रचारार्थ मंगळवारी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत मंत्री नितेश राणे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शिवाईनगर येथील श्री संकटमोचक हनुमान मंदिर येथून ओपन जीपमध्ये सवार होऊन प्रारंभ झालेल्या ह्या रॅलीमध्ये महायुतीच्या तिन्ही उमेदवारांसह आमदार संजय केळकर, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करीत देवाभाऊ गीताने गुंजलेली ही रॅली तब्बल दोन तास चालली.
रॅली दरम्यान माध्यमांशी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी, व्होट जिहाद वर प्रखर भाष्य केले. आम्ही मुंबई – ठाणे या शहरांच्या विकासावर निवडणुका लढवतोय तर, दुसऱ्या बाजुला अजान बंद करणाऱ्याच्या विरोधात, मशिदी विरोधात बोलणाऱ्याच्या विरोधात मतदान द्या. असे धर्माच्या नावाने मतदान मागितलं जात आहे. याप्रकारे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करण्याची मागणी करणे, हा एक प्रकारे व्होट जिहाद असुन हेच मी जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केल्याचे ना. राणे यांनी सांगितले. एका बाजुला हिंदु समाजाला डिवचायचे आणि दुसऱ्या बाजुला मशिद आणि अजानच्या नावाने मते मागायची, एकीकडे संविधानाच्या गोष्टी करायच्या दुसरीकडे धर्माच्या नावाने मतदानाचे फतवे काढायचे,असे यांचे कारनामे सुरू आहेत. तेव्हा, राष्ट्रभक्त हिंदु समाजाने जागरूक राहुन १५ तारखेला मतदान करावे. ठाण्यात “जय श्रीराम” वाला महापौर बसला नाही तर १६ तारखेला हिरवे गुलाल उधळतील. असा सावधानतेचा इशारा मंत्री राणे यांनी दिला.
Box – हिंमत असेल तर मोहल्यातील मतदारांचे हातपाय तोडा
बोगस मतदारांना मारणार म्हणणाऱ्या मनसेला प्रत्युत्तर देताना मंत्री नितेश राणे यांनी, हिंमत असेल तर बेहरामपाडा, नळबाजार येथील मोहल्यामध्ये बुरखे घालुन मतदान करतात. तिथे जाऊन त्यांचे हातपाय तोडा. तेव्हा कळेल बाळासाहेबांच्या विचारांचे कोण? असे आव्हान दिले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनतेने २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये कौल दिला आहे, मनसेसारखा शुन्य मिळालेला नाही. अशी खिल्लीही त्यांनी मनसेची उडवली.AG/ML/MS