सर्पमित्रांनी दिले ८ हजार सापांना जीवनदान….

वाशिम, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): साप म्हणजे सरपटत येणारा मृत्यू हा अनेकांचा असणारा समज वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील सर्पमित्र हर्षल रामटेके आणि त्यांच्या निसर्ग व्यासंगी सहकाऱ्यांनी दूर केला असून आजपावेतो वाशिम जिल्ह्यातील या सर्पमित्रांनी तब्बल ८ हजार सापांना मानवी वस्तीतुन सुरक्षित पकडून निसर्ग अधिवासात सोडून देउन जीवनदान दिले आहे.
सापाबद्दल समाजामध्ये अनेक समज गैरसमज असून साप दिसताच त्याला संपवून टाकले जाते मात्र जिल्ह्यातील सर्पमित्रांच्या जनजागृतीमुळे सापाबद्दल असलेली भीती आणि समज दूर होऊन साप आढळताच लोक आता सर्पमित्रांना पाचारण करीत आहेत.
कारंजा येथील सर्वधर्म आपात्कालीन संस्थेत काम करणारे सर्प मित्र हर्षल रामटेके यांनी आजपावेतो ८ हजारांवर विषारी, बिन विषारी सापांना जीवदान दिले आहे. त्यांनी अलीकडे साप पकडण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले असून जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयामध्ये सापांबद्द्ल असलेले गैरसमज दूर करून जनजागृती करण्याचे काम या युवकाकडून केले जात आहे.
दरम्यान, निसर्गातील कुठलाही हिंस्त्र प्राणी जोवर त्याच्या जीवाला धोका आहे याची जाणीव त्याला होत नाही तोपर्यंत स्वतःहून कधीच कुणावर हल्ला करीत नाही. सापाबद्दलही असेच काही असून स्वतःहून कुठलाही साप डंख करीत नाही. त्यामुळे साप आढळल्यास त्याला न मारता सर्पमित्रांना पाचारण करावे असे आवाहन सर्पमित्र हर्षल रामटेके यांनी केले आहे. Snake lovers gave life to 8 thousand snakes.