साहित्य संमेलनाचा प्रसार सप्त खंजिरीच्या कार्यक्रमातून …
वर्धा, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने वर्धा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीमध्ये ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.
स्वावलंबी शिक्षण मंडळाचे पटांगण, बॅचलर रोड, वर्धा येथे ३ ते ५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान होत आहे. त्या अनुषंगाने संमेलनाच्या उद्घाटनाच्या दोन दिवस आधीच बुधवारी म्हणजे काल सायंकाळी सत्यपाल महाराज यांच्या सप्त खंजिरी भजनाचा कार्यक्रम साहित्य संमेलन स्थळी झाला. प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी दोन दिवसा आधीच सत्यपाल महाराज यांच्या सप्त खंजिरीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं.
विदर्भात प्रसिद्ध असणाऱ्या सत्यपाल महाराजांच्या खंजिरीला देखील कला रसिकांनी तेवढीच दाद दिली. खंजिरीमधून प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज गेल्या कित्येक वर्षापासून खंजिरीच्या नादावर प्रबोधन करीत आहे. त्यांच्या चाहत्यांनी साहित्य संमेलन स्थळी सत्यपाल महाराजांची भेट घेत जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला.
या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिनांक ३ तारखेला होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे शिक्षण व भाषा मंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहील. ज्येष्ठ साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत तर स्वागताध्यक्ष दत्ता मेघे असणार आहेत.
ML/KA/SL
2 Feb. 2023