निवासी भागात फटाके विक्रीस बंदीसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवाळी सणाच्या निमित्ताने आता शहरांत चौकाचौकात ठिकठिकाणी फटाके विक्रीचे स्टॉल्स दिसू लागतील. बिल्डींग्स, दुकाने, रस्ते यांना अगदी लागून उभारलेले हे स्टॉल्स म्हणजे आगीला आमंत्रणच असतात. दरवर्षी फटाका स्टॉल्सना आग लागल्याच्या घटना देशभरात घडून येतात. या ओढवून घेतलेल्या आपत्तीला टाळण्यासाठी आता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. ठाणे- कोपरी परिसरातील निवासी भागात काहीजणांनी फटाक्यांची विक्री करणारी दुकाने थाटली आहेत.अशा फटाके विक्रीला कोपरी बचाव समितीने विरोध करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या फटाके विक्रेत्यांचे मोकळ्या मैदानात स्थलांतर करावे, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.
दरम्यान फटाके विक्री निवासी भागात न करता खुल्या मैदानात करावी असे निर्देश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.तरीही न्यायालयाचे हे निर्देश डावलून कोपरीतील काही निवासी भागात दुकानदारांनी फटाक्याची मोठीमोठी दुकाने थाटली आहेत.यासंदर्भात कोपरी बचाव समितीने ठाणे महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन अशा दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.मात्र त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने आता समितीच्यावतीने हरेश सारवान यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.यामध्ये ठाणे पालिकेला प्रतिवादी केले आहे.
याबाबत फटाके व्यावसायिकांचे म्हणणे आहे की,ज्यांच्याकडे केंद्र शासनाचा कायमस्वरूपी परवाना आहे,ते जागेवरच व्यवसाय करू शकतात. या परवान्याचे दर पाच वर्षांनी नूतनीकरण होत असते.ही कायदेशीर प्रक्रिया असून हा नियम देशभरात आहे.मात्र नवीन लोकांना तात्पुरत्या स्वरुपात पालिका खुले मैदान उपलब्ध करून देत असते.
ML/ML/SL
16 Oct. 2024