पाणीपुरीची चटक पडली महागात, 80 पेक्षा अधिकांना विषबाधा

जळगाव, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चोपडा तालुक्यातील कमळगाव येथे आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने कमळगाव आणि आजूबाजूच्या खेड्यांतील तसेच चांदसणी, मितावली, पिंप्री येथील ८० हून अधिक जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली असून काही बालकांची परिस्थीती गंभीर असल्याचे समोर आले आहे. यात ३० जणांना अडावद येथील ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले असून तर इतरांना चोपडा आणि जळगाव येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
चोपडा तालुक्यातील कमळगाव आणि आजूबाजूच्या चांदसणी, मितावली, पिंप्री येथील ग्रामस्थ आठवडे बाजारासाठी आले होते. तेथील पाणीपुरी विक्रेत्यांकडून अनेकांनी पाणीपुरी खाल्ली. तर काहींनी पाणीपुरीचे पार्सल घरी नेले होते. पाणीपुरी खाल्लेल्यांना उलट्या, जुलाब, पोटात दुखणे असे त्रास जाणवू लागले. यात मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढली असून 80 पेक्षा अधिक लोकांवर उपचार सुरू आहेत. त्यात काही बालकांची स्थिती गंभीर असून अजून रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभाग सतर्क झाला असून चोपडा तालुक्यातील अनेक आरोग्य केंद्रातून पथके ही तपासणीसाठी पाठवण्यात आली असून पाणीपुरी विक्रेत्याला अधिक चौकशी साठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
ML/ML/SL
19 June 2024