नामांतर लढ्याचे अग्रणी गंगाधर गाडे यांचे निधन

छ. संभाजीनगर, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आंबेडकरी चळवळीतील अग्रणी नेते, पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी राज्यमंत्री गंगाधर सुखदेव गाडे (76) यांचे आज सकाळी 4.30 वाजता निधन झाले. त्यांचे पार्थिव रविवार दिनांक 5 मे रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत उस्मानपुरा पीर बाजार येथील त्यांच्या नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिक्षण संस्थेच्या परिसरातच अंत्यविधी केला जाणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सौ सूर्यकांता गाडे, मुलगा डॉ. सिद्धांत गाडे, सून डॉ. भावना वंजारी गाडे, बहिण निर्मला गवई, मेहुणे गुणवंत गवई, नातवंडे असा परिवार आहे.
रविवारी 5 वाजता शिक्षण संस्थेच्या परिसरातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये १९७० च्या दशकात मिलिंद महाविद्यालयात शिक्षण घेत असताना शिष्यवृत्तीच्या प्रश्नावरून गंगाधर गाडे यांचे विद्यार्थी नेतृत्व उदयाला आले होते. विद्यार्थी नेते म्हणून गंगाधर गाडे यांनी नागसेनवन आणि विद्यापीठात चांगली पकड निर्माण केली होती. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी सर्वप्रथम गंगाधर गाडे यांनी केली होती. त्यानंतर नामांतर प्रश्न चिघळला, या आंदोलनाचे अग्रणी नेतृत्व गाडे यांनी केले.
मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करा अशी मागणी त्यांनी 1977 मधे त्यांनी केली होती. त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन, मोर्चे काढून त्यांनी सरकारला जेरीस आणले होते. 1978 मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचा जन्म झाला मात्र, जोपर्यंत नामांतर होणार नाही तोपर्यंत मी माझ्या मुलाचं नावही ठेवणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांनी घेतली आणि त्यांनी ती पाळली देखील. याप्रश्नावरून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना ते थेट भिडले होते. गाडे यांच्या नेतृत्वात सातत्यपूर्ण आंदोलन आणि नामांतर योद्ध्यांचे बलिदान यामुळे नामांतर आंदोलन यशस्वी झाले. 1994 साली नामांतराचा लढा पूर्ण झाला.
शरद पवार मुख्यमंत्री असताना 14 जानेवारी रोजी त्यांनी नामांतर झाल्याची घोषणा केली. त्यानंतरच गंगाधर गाडे यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचे नाव सिद्धार्थ असं ठेवलं. पुढे कॉँग्रेस सरकारमध्ये गाडे यांना राज्यमंत्री पद देण्यात आले. माजी मंत्री गाडे यांनी विद्यार्थी हिताचे अनेक आंदोलने हाती घेऊन ती यशस्वी केली. या दरम्यान अनेक कार्यकर्ते त्यांनी घडवली. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
ML/ML/SL
4 May 2024