महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून
![महाराष्ट्र विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जूनपासून](https://mmcnewsnetwork.com/wp-content/uploads/2023/03/Maharashtra-assembly.jpg)
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकीचे निकाल हाती आल्यावर केंद्रातील सत्तास्थापनेच्या कामाला वेग आलेला आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. त्यामुळे राज्यातील विरोधी पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आत्ताचे पावसाळी अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशनाबाबत घोषणा करण्यात आली आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन येत्या २७ जून रोजी पार पडणार आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन १० जून रोजी होणार होते, मात्र आता हे अधिवेशन २७ जूनपर्यंत पुढं ढकलण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अधिवेशन दोन आठवड्याने पुढे ढकलण्यात आले आहे.
लोकसभा निवडणूक पार पडल्याने आचारसंहिता संपली आहे. मात्र राज्यात विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा चार जागांकरिता निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या या भागात आचारसंहिता कायम राहणार असल्याने अधिवेशन पुढे ढकलण्यात आले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यामध्ये चारा छावणी व पाणी टंचाई यावर देखील मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा झाली. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीबाबत माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. विधिमंडळाचे १० जूनपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले आहे. विधान परिषदेच्या ४ जागांची निवडणूक संपल्यानंतर म्हणजे जुलैमध्ये हे अधिवेशन होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याच महिन्यात २८ तारखेला पावसाळी अधिवेशन घेण्याची घोषणा करण्यात आली.
SL/SL/ML
6 June 2024