लातूर बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमधील नालेसफाई पूर्ण;व्यापाऱ्यांनी मानले आभार

लातूर, दि 30
नुकत्याच झालेल्या पावसामुळे लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केट आवारात नाल्या तुंबल्याने मोठी अडचण निर्माण झाली होती.
नाल्यांमधील कचरा आणि घाण पाणी बाहेर आल्यामुळे भाजी मार्केटमध्ये येणाऱ्या नागरिक आणि व्यापाऱ्यांना पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.
या समस्येबाबत भाजी मार्केटमधील व्यापारी श्रीकांत ठोंबरे,काशिनाथ झांबरे,अस्लम बागवान,इरफान बागवान आणि सय्यद नूर अली यांनी माजी मंत्री
आमदार अमित विलासराव देशमुख यांना माहिती दिली.
ही बाब निदर्शनास येताच माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी तात्काळ लातूर महानगर पालिका आणि बाजार समिती प्रशासनाला सूचना केल्या.त्यांच्या निर्देशानुसार, स्वच्छता विभागाची यंत्रणा कामाला लागली आणि जेसीबीच्या साहाय्याने लातूरच्या भाजीपाला मार्केटमधील सर्व नाल्यांची
साफसफाई एका दिवसात पूर्ण करण्यात आली.या तातडीच्या कार्यवाहीमुळे पाणी तुंबण्याची समस्या दूर झाली आणि परिसरातील अडचण कमी झाली.
याबद्दल भाजीपाला मार्केटमधील लहान-मोठे व्यापारी आणि भाजीपाला विक्रेते यांनी माजी मंत्री आमदार अमित देशमुख,मनपा प्रशासन आणि लातूर बाजार
समितीचे आभार मानले.
यावेळी बाजार समितीचे प्रभारी सचिव-अरविंद पाटील,सहाय्यक सचिव-सतीश भोसले,ओवरसीअर- दर्शन भोसले यांच्यासह मनपा आणि बाजार समितीचे संबंधित कर्मचारी उपस्थित होते.