पाण्यासाठी वीज द्या!
वाशिम, दि. 03 (एमएमसी न्यूज नेटवर्क): वाशीम तालुक्यातील ग्राम एकांबा येथील मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले असून वारंवार मागणी करून देखिल महावितरण विभागाकडून पेयजल योजना कार्यान्वित करण्यासाठी ट्रांस्फॉर्मर न दिल्यामुळे योजनेचे काम पुर्ण होऊनदेखील केवळ वीज जोडणीअभावी गावकरी महीलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
त्यामुळे संतप्त महिलांनी काल ग्रामपंचायत एकांबा येथे रिकामी भांडी घेऊन महावितरण विभागाच्या विरोधात आंदोलन करून निषेध नोंदवीला.
ग्रामपंचायत एकांबा येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम पूर्ण झाले असून दारोदारी नळ देखील बसविण्यात आले आहेत, मात्र कायमस्वरूपी विद्युत रोहीत्र नसल्यामुळे मुबलक पाणी असूनदेखील पेयजल योजना कोरडी पडली आहे.
विद्युत रोहीत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत एकांबा येथील सरपंच नारायण चव्हाण यांनी ११ ऑक्टोबर २०१९ रोजी महावितरणला रितसर प्रस्ताव पाठवून सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने १९,९७९ रूपये रकमेचा २९ मे २०२० रोजी भरणा केला आहे.for water
सलग ३ वर्षांपासून ग्रामपंचायत एकांबाच्या वतीने पेयजल योजनेसाठी ट्रांस्फॉर्मर बसवण्यासंदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार केला, गतवर्षी १२ डिसेंबर रोजी महावितरणचे अधिक्षक अभियंता यांनी मिळालेल्या तक्रारीनुसार कार्यकारी अभियंता यांना एकांबा येथील तक्रारीचे निवारण करण्यासंदर्भात सूचना दिल्यात मात्र महावितरण विभागाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे महावितरण विभागावर कुणाचा राजकिय दबाव आहे काय असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.
दरम्यान ३० दिवसांत पेयजल योजनेसाठी विद्युत ट्रॉंस्फार्मर न बसविल्यास गावकरी व महीलांना घेऊन जिल्हा स्तरावर आंदोलन व पर्यायाने प्रकरण न्यायालयात खेचण्याचा ईशारा एकांबा येथील सरपंच नारायण चव्हाण यांनी महावितरणला दिला आहे.
ML/KA/PGB
03 Jan. 2023