शेतकऱ्यांना आता वीज सौरऊर्जा ग्रीड मधून
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी आठ हजार मेगावॉट सौर ऊर्जा निर्मितीचे ग्रीड तयार करण्यात येत असून त्यातील पहिल्या टप्प्यातील काम सुरू करण्यात आलं आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली, विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या नियम २९३ अन्वयेच्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या चर्चेला ते उत्तर देत होते.
सध्याची वीज दिवसा देणे खूप महागाचे आहे, शेतकऱ्यांना आपण स्वस्तात वीज देतो , सौर ऊर्जा जवळपास अर्ध्या किमतीत उपलब्ध होते त्यामुळे त्याच्या ग्रीडचं जाळे राज्यभर उभारले जाईल असं ते म्हणाले. आता १६५० मेगावॉट वीजनिर्मिती साठी निविदा काढण्यात आली आहे, आठ हजार मेगावॉट पैकी निम्मी कामं २०२५ पर्यंत सुरू केली जातील त्यासाठी केंद्राच्या कुसुम योजनेचं अर्थसहाय्य मिळेल असं फडणवीस म्हणाले.
कृषी वीज बिलांची थकबाकी ४८,६८९ कोटींची आहे , त्यातील चालू बिलाचीच रक्कम भरायला सांगितलं जातं आहे , सक्तीची वसूली केली जात नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.Farmers now get electricity from solar power grid
विदर्भातील दुष्काळी भागासाठी पाणी देण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखून कालवा माध्यमातून योजना राबवित आहोत , दमणगंगा , एकदरे , पिंजाळ चे पाणी मुंबईत आणून , मुंबईच्या वैतरणेचे पाणी मराठवाड्याकडे दिलं जाईल , कृष्णा भीमा स्थिरीकरण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी त्यात जोडून ते मराठवाड्याला दिलं जाईल याशिवाय सातपुड्यातील वाहून जाणारे पाणी विदर्भातील खारपाण पट्ट्यात आणण्याची योजना असल्याची माहिती फडणवीस यांनी आपल्या उत्तरात दिली.
लंपी आजारात ३७,६२८ पशूंना बाधा झाली होती, दगावलेल्या जनावरांच्या नुकसानभरपाईची रक्कम सत्तर कोटी इतकी देण्यात असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या उत्तरात दिली.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतील कोणताही निधी केंद्राला परत गेलेला नाही, आता पर्यंत ७९ टक्के रक्कम खर्च झाली आहे, उर्वरित ३१ मार्च पर्यंत केली जाईल अशी माहिती कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या उत्तरात दिली. नाफेडची ४२ कांदा खरेदी केंद्रे सुरू आहेत त्यातून ४५,९९६ क्विंटल कांदा खरेदी आजवर झाल्याचं ही सत्तार यांनी सांगितलं.
ML/KA/PGB
14 Mar. 2023