लग्नातल्या डीजेमुळे मेल्या १४० कोंबड्या, गुन्हा दाखल
लखनौ, दि. 30 : उत्तर प्रदेशातील कुक्कुटपालन व्यावसायिकाने आपल्या शेतातील १४० कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. २५ एप्रिलच्या रात्री शेताजवळून जाणाऱ्या एका लग्नाच्या वरातीत वापरल्या गेलेल्या डीजेच्या मोठ्या आवाजातील संगीतामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप त्याने तक्रारीत केला आहे.उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यात ही दुर्दैवी घटना घडली. त्या रात्री स्थानिक रहिवासी बब्बन विश्वकर्मा यांच्या मुलीची वरात गावातून निघाली. ही वरात कुडवार भागातील रामभद्र पूर्वा येथून आली होती. वरातीत मोठ्या आवाजात संगीत वाजवणारा एक डीजे सहभागी होता.गावाजवळ साबिर अली यांचा पोल्ट्री फार्म आहे. पोल्ट्रीजवळून लग्नाची वरात रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास गेली. साबिरच्या सांगण्यानुसार, डीजेच्या प्रचंड आवाजामुळे कोंबड्यांमध्ये घबराट उडाली. पक्ष्यांना तो भयावह आवाज सहन झाला नाही आणि परिणामी, त्यातील १४० कोंबड्यांचा मृत्यू झाला.पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत, साबिर अलीने त्या आवाजाचे वर्णन ‘अतिशय तीव्र’ (high-decibel) अशा स्वरुपाचं केलं आहे. या आवाजामुळे कोंबड्या घाबरल्या आणि त्यांचा मृत्यू झाला, असा दावा त्याने केला आहे. “तो आवाज इतका तीव्र होता की, त्यामुळे कोंबड्या घाबरल्या आणि मरण पावल्या” असे साबिरने त्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर, पोलिसांनी मंगळवारी रात्री पारसीपूर येथील डीजे चालक कवी यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
SL/ML/SL