हिंमत असेल तर नवे राज्यपाल आणून दाखवा!
जालना, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ‘राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणते राज्यपाल अभिभाषण करणार, महाराष्ट्रद्वेष्टे राज्यपाल की नवे राज्यपाल? महापुरुषांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांनाच अभिभाषण करू देणार का?’ असा सवाल करत शिवसेना नेते, आदित्य ठाकरे यांनी ‘हिंमत असेल तर नवे राज्यपाल आणून दाखवा’, असं आव्हान राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारला दिलं आहे.
शिवसेनेच्या शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने मराठवाड्यातील सोमठाणा येथे आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. येथील भव्य सभेत बोलताना आदित्य ठाकरे यांनी राज्यातील सरकार आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा, असे आव्हान देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. आता हे गद्दार केवळ गद्दार राहिले नाही तर ते गुलाम झाले आहेत, असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला.
त्यासोबतच हे लोक कबडीच्या मैदानात गेले की म्हणतात आठ महिन्यांपूर्वी आम्ही कबड्डी खेळलो, दहीहंडीच्या ठिकाणी गेलो तर म्हणतात आम्ही सहा महिन्यांपूर्वी थर लावले, क्रिकेटच्या मैदानात गेले तर म्हणातात आम्ही मोठी मॅच खेळलो मात्र हे सगळं खोक्यातच चालतं. मात्र गद्दारीला फार आयुष्य नसतं,ज्यादिवशी संविधानाप्रमाणे निकाल येईल त्यादिवशी हे सरकार नामशेष झालेलं असेल आणि हे गद्दारही नामशेष झालेले असतील असा ठाम विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री बर्फ बघायला गेले होते
मुख्यमंत्री दावोसला गेले तेव्हा त्यांनी बर्फ बघितला. मात्र तिथून राज्यासाठी काय आणलं त्यांचं त्यांनाच माहिती. ही सगळी आभासी गुंतवणूक आहे. त्याची पोलखोल झाली की मात्र ते गप्प बसले आणि काही बोलले नाही, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. आम्ही आमचं महाविकास आघाडी सरकार असताना केलं ते खणखणीत वाजवून केलं.
शेतकऱ्यांना विनाअट कर्जमुक्ती दिली याची आठवणही त्यांनी करून दिली. मिंधे सरकारकडे सांगण्यासारखं काय आहे? असा सवाल करतानाच कालच्या सभेवरून त्यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोला लगावला की, सांगण्यासारखं काही नसल्यानं ते रिकाम्या खुर्च्याना मन की बात सांगतात आणि सभेतल्या खुर्च्यानाही यांचा कंटाळा आला आहे आणि आम्हाला उचलून घ्या असं खुर्च्याही म्हणताहेत.
आपल्या राज्यातून बाहेर उद्योग चालले कसे? यावर जनतेसमोर चर्चा करू.ही चर्चा तुम्ही जिथे करायला तयार आहात तिथे मी येईन. वेळप्रसंगी वर्षावरही चर्चेसाठी बोलावलं तरीही यायला तयार असल्याचे आव्हान आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिले आहे.शिवसंवाद यात्रेनिमित्त आदित्य ठाकरे जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा येथे आले होते.तिथे आयोजित सभेत त्यांनी राज्यसरकार आणि मुख्यमंत्र्यांना हे आव्हान दिले आहे.
राज्याचे तुकडे करायचा विचार
महाराष्ट्राचे ५ तुकडे करायचे आहे,असं सांगत हे सरकार निवडणूक घ्यायला घाबरते अशी खिल्ली त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारची उडवली.Bring a new governor if you dare!
स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके असं हे सरकार आहे.मात्र कुणाचा शो फ्लॉप झाला,याचा मी आनंद साजरा करत नाही असंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री हे नाव न घेता ठाकरे कुटुंबावर टीका करत असून ते ठाकरे परिवाराला संपवायला निघाले.हे त्यांनी सांगून दाखवावं असं आव्हान देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.
ML/KA/PGB
8 Feb. 2023