देशातील 11 शहरांचा Air quality index 300 पार

Factory with air pollution.
मुंबई, दि. २७ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळा सुरू झाला की देशातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषणाची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवू लागले. त्यातच दिवाळीच्या सणानिमित्त वाजविण्यात येणाऱ्या फटाक्यांची भर पडते. यावर्षी दिवाळी पूर्वीच देशातील ११ शहरातील वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे.
AQI.in वर उपलब्ध माहितीनुसार , आज सकाळी देशातील 11 शहरांची AQI पातळी 300 च्या वर नोंदवण्यात आली होती. यामध्ये भिवाडी, दिल्ली, नोएडा, मेरठ, गाझियाबाद, जयपूर, बुलंदशहर, अमृतसर, अलीगढ, सोनीपत आणि फरिदाबाद या शहरांचा समावेश आहे.
610 AQI सह राजस्थानमधील भिवाडी सर्वात धोकादायक स्थितीत होते. दिल्ली देखील गॅस चेंबर बनले आहे, येथे रविवारी सकाळी आनंद विहारमध्ये 400 च्या वर AQI नोंदवण्यात आला.आग्रामध्येही प्रदूषण आणि धुक्यामुळे ताजमहाल अस्पष्ट दिसत होता. मुंबईतील मरीन ड्राइव्हवरही सकाळी धुक्याचा थर पाहायला मिळाला.दिवाळीपूर्वी दिल्लीतील वायू प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीने (DPCC) 1 जानेवारी 2025 पर्यंत फटाक्यांवर बंदी घातली आहे. शासनाच्या आदेशानुसार फटाके बनवणे, साठवणे, विक्री करणे आणि वापरणे यावर बंदी घालण्यात आली आहे. एवढेच नाही तर फटाक्यांच्या ऑनलाइन वितरणावरही बंदी घालण्यात येणार आहे. यामध्ये हरित फटाक्यांचाही समावेश आहे. या बंदीची कडक अंमलबजावणी करण्याची जबाबदारी दिल्ली पोलिसांवर सोपवण्यात आली आहे. दिल्ली पोलीस आपला अहवाल दररोज डीपीसीसीला सादर करतील.
ML/ SL/ ML
27 Oct 2024