मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पूर्णत्वाची नेमकी डेडलाईन कोणत्या वर्षाची?

महाड दि २८(मिलिंद माने)– सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून रत्नागिरी , रायगड या तीन जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्त्वकांक्षी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात होऊन तब्बल १८ वर्षाचा कालावधी लोटला. मात्र मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम नेमके कोणत्या वर्षात पूर्ण होणार असा सवालच आता कोकणकर जनता राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना विचारत असून सन २००५ पासून तयार झालेल्या DPR. प्रोजेक्ट मध्ये वाढत्या वाहतुकीनुसार बदल गरजेचे असल्याचे अनेक वाहतूकदार संघटने सहित कोकणातील जनतेकडून यात बदल करण्याची मागणी होत आहे.
राज्यातील मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग या महामार्गाची कामे ज्या पद्धतीने युद्धपातळीवर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प विभागाकडून पूर्ण केली गेली त्याच धर्तीवर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम का झाले नाही असा सवाल सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यासह राज्यातील कोकणात येणाऱ्या पर्यटकांसह , उद्योजक राज्य सरकारला विचारत आहेत.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी सन १९८३ वर्षापासून सुरू झाली आज या प्रक्रियेला ४२ वर्षाचा कालावधी लोटला.
त्यानंतर सन २००५ पासून या महामार्गाचा डीपीआर
(Detailed Project Report) या वर्षात बनवण्यात आला मात्र तेव्हापासून या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आज तब्बल १८वर्षाचा कालावधी लोटला. मात्र हा महामार्ग पूर्णत्वास नेण्याचे नाव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग यांनी नेमलेल्या ठेकेदाराकडून होत नसल्याचे चित्र आज कोकणात रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहण्यास मिळत आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला सुरुवात होऊन आज १८ वर्षाचा कालावधी लोटला. मात्र एक वर्ष देखील गणेशोत्सव काळात विना खड्ड्यातून कोकणातील जनतेने प्रवास केलेला नाही. या महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत व नेमण्यात आलेल्या ठेकेदारांमार्फत कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची असल्याची तक्रार सुरुवातीपासून आजपर्यंत कोकणातील जनतेने राज्य सरकार सह केंद्र सरकार व कोकणातून निवडून दिलेल्या आमदार खासदार यांच्याकडे केली. मात्र कोकणातील जनतेच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम ज्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासहित त्यांनी नेमलेल्या ठेकेदार व लोकप्रतिनिधींनी केले. यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची वाताहत आज १८ वर्षानंतर देखील कोकणातील जनतेला अनुभवण्यास मिळत आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची श्वेतपत्रिका काढा!
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची मूळनिविदा किती रकमेची होती त्यानंतर या महामार्गाच्या पळस्पा फाटा ते सिंधुदुर्ग पर्यंत मानण्यात आलेल्या उड्डाणपूल व भुयारी मार्गावर तसेच या तिन्ही जिल्ह्यातील बनवण्यात आलेल्या सर्विस रोडवर आत्तापर्यंत किती निधी खर्च झाला. तसेच केलेल्या कामाची देखभाल दुरुस्ती किती महिने होती, देखभाल दुरुस्ती कालावधी असताना देखील त्यावर पडलेले खड्डे व डागडुजी वर झालेला खर्च राष्ट्रीय महामार्ग विभागाने केला की संबंधित एजन्सी धारकाने मुंबई-गोवा
राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणा करिता, डांबरीकरणाचा रोड पूर्णतः उखडून त्या जागी सिमेंट काँक्रीट चा रस्ता बनवण्यात आला.
मात्र सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला लेवल नसल्याने( सम पातळीत रस्ता न बनवल्याने) आज सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरून वाहने चालवताना जम्पिंग जॅकचा अनुभव कोकणातील जनतेला १८ वर्षात. पाहण्यास मिळाला आहे मात्र काँक्रीट रस्त्यापेक्षा डांबरी रस्ता बरा होता अशी म्हणण्याची वेळ कोकणकर जनते वर आली आहे या महामार्गाच्या सर्विस रोड सहित उड्डाणपुलाची तर मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाल्याने स्थानिक जनतेला नाक दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. अनेक सर्विस रोडवर पाण्याचे साम्राज्य तसेच उड्डाणपूलांवर देखील पाण्याचे तळे साचल्याचे चित्र सर्वत्र पाहण्यास मिळते मात्र केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी अथवा राज्यातील तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील, रवींद्र चव्हाण व आत्ताचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अभय सिंह राजे भोसले या सर्वांनी कोकणात जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होईल असे दरवेळेला नवीन तारीख नवीन वर्ष जाहीर केले. मात्र आज केलेल्या कामाची गुणवत्ता निकृष्ट दर्जाची असल्याने काँक्रीट करण्यापेक्षा डांबरीकरणाचाच महामार्ग उत्तम राहील असे आता कोकणकर जनतेला वाटू लागले आहे.