मुंबई गोवा महामार्गावरील साईड पट्ट्या झाल्या कचऱ्यांचे माहेरघर?

महाड दि २५ (मिलिंद माने)– मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील साईड पट्ट्या या कचऱ्याच्या माहेर घर झाल्या असून वाढत्या नागरीकरणामुळे गावांचे शहरीकरण जरी झाले असले तरी कचऱ्यासाठी डम्पिंग ग्राउंड व्यवस्था नसल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या बाजूच्या साईड पट्ट्या या कचऱ्याच्या माहेरघर झाल्याचे चित्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी पाहण्यास मिळत आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणामुळे अनेक छोटी मोठी गावे जरी समृद्धीकडे वाटचाल करत असली तरी ग्रामपंचायतच्या मनमानी कारभारामुळे गावठाण, गुरुचरण जागा. या अतिक्रमण बाधित झाल्याने ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्यासाठी डंपिंग ग्राउंड शिल्लकच न राहिल्याने अनेक महामार्गावरील ग्रामपंचायती कचरा गाडी मार्फत गोळा झालेला कचरा महामार्ग लगतच्या साईड पट्ट्यांवर टाकून आपले सोपस्कार पार पाडत असल्याचे चित्र मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी पासून थेट पनवेल पर्यंत पाहण्यास मिळते.
महामार्ग लगत कचरा टाकल्यामुळे या कचऱ्यातून आपले अन्नाचे भक्षण शोधणाऱ्या पाळीव जनावरे या कचरा कुंडीकडे जाऊन टाकलेला कचरा अस्ताव्यस्त करतात त्यातच भटके श्वान व कावळे व अन्य पशुपक्षी आपल्या अन्नाच्या शोधार्थ या कचरा डेपो कडे वळतात त्यामुळे साईड पट्ट्यांच्या बाजूला असलेला कचरा महामार्गावर येऊन पडतो व त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पाहण्यास मिळते.
राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ग्रामपंचायतींना कचरा टाकण्यासाठी डम्पिंग ग्राउंड शिल्लक नाही, यामुळे रस्त्यावर टाकलेल्या कचऱ्यामुळे या कचराकुंडीत असणारी पाळीव जनावरे व भटके श्वान यांच्यामध्ये अनेक वेळेला एकमेकांच्या अंगावर जाऊ वाद उत्पन्न झाल्याने महामार्गावर यामुळे अपघात देखील झाल्याच्या घटना घडल्या आहेत. महामार्ग लगत असणाऱ्या ग्रामपंचायतींच्या नागरीकरणामुळे ग्रामपंचायतींना महसूल प्राप्त होत असला तरी कचरा समस्या निवारण करण्याकडे मात्र कोणतीही ग्रामपंचायत जाणीवपूर्वक लक्ष देत नाही.
याचा परिणाम जागोजागी महामार्गालगत कचरा डेपो झाले असून कचरा डेपो बरोबर वाढत्या नागरीकरणामुळे एखादे जुने घर व एखादी इमारत पाडून निर्माण झालेला मातीचा व सिमेंट काँक्रीट च डेब्रिज टाकण्याचे उद्योग देखील काही महाभाग करीत असल्याने राष्ट्रीय महामार्ग आहे हे कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड अशा प्रश्न निर्माण होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण गप्प का?
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्हा पासून पनवेल पर्यंत कोणत्या ना कोणत्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जाणाऱ्या या महामार्गावरील रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या साईड पट्ट्यांवर मोठ्या प्रमाणावर कचऱ्याचे ढग जमा होत असताना ज्या राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या ताब्यामध्ये हा रस्ता आहे तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभाग मात्र डोळ्यावर काळी पट्टी बांधून गप्प का बसतो असा सवाल या महामार्गावरून जाणारे लाखो प्रवासी या विभागाला विचारीत आहेत.
त्याचबरोबर ज्या ग्रामपंचायतींकडे कचरा डेपो साठी जागा उपलब्ध नाही अशा ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत हद्दीमध्ये नवीन बांधकामांना परवानगी न देण्याचे बंधन ग्रामविकास विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होणे अपेक्षित आहे मात्र सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या व सत्कार समारंभाच्या सोहळ्यामध्ये अडकणाऱ्या व स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकीय राजवट असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना याबाबत मात्र कोणते देणे घेणे नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मागील दोन ते चार वर्षापासून प्रशासकीय राजवट लागल्याने प्रशासकीय अधिकारी केवळ स्वतःचे भले करण्याचे काम करीत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने महामार्गालगत कचरा डेपो सारखा समस्या यातून निर्माण होत आहे. मात्र त्या दूर करण्याकडे होत असलेले दुर्लक्ष पाहता भविष्यात महामार्गालागत कचरा डेपो या मोठ्या समस्या निर्माण होतील. ML/ML/MS