पालक आहात, मालक नाही!

NEET परीक्षेच्या तयारीसाठी बापाने पोरीला क्लास लावला. क्लासमध्ये झालेल्या सराव परीक्षेत लेकीला अपेक्षित मार्क्स मिळाले नाहीत याचा मुख्याध्यापक असलेल्या बापाला भलता राग आला. लेकीच्या शिक्षणावर बाप पैसे खर्च करत होता त्या बदल्यात त्याला घसघशीत मार्क्सच्या रूपाने रिटर्न्स हवे होते.
बापाचं टाकून बोलणं असह्य झाल्यानं “तुम्ही अभ्यास केला होतात. तुम्ही कुठे कलेक्टर झाला. शिक्षक झालात ना?” पोरगी उलटून बोलल्याने बापाचा पारा चढला. त्याने जात्याच्या खुट्याने, लाथा बुक्क्यांनी पोरीला जबर मारहाण केली. एकदा नव्हे तर अनेकदा बापाने अमानुषपणे मारहाण केली. जबर मारहाण झाल्याने अर्धमेली झालेली पोरगी रात्रभर निपचित पडून राहिली. दयामाया नसलेल्या पाषाणहृदयी बापाने तिच्याकडे दुर्लक्ष केलं. निर्दयी बाप शनिवारी सकाळी खुशाल शाळेत निघून गेला.
घरी आल्यावर मुलगी बेशुद्ध असल्याचं आईने सांगितल्यावर पोरीला दवाखान्यात नेण्यासाठी धावपळ सुरू झाली. तोपर्यंत वेळ फितूर झाली होती. त्या अभागी लेकराच्या शरीरातून प्राण निघून गेला होता. ही घटना वाचून मन सुन्न झालं. एकाएकी उदास वाटू लागलं. काही काळ तर काय बोलावं, काय लिहावं कसं व्यक्त व्हावं…. अशी विमनस्क मन:स्थिती झाली होती.
भारताच्या संदर्भाने विचार करतो तेव्हा मुलांना जन्मताच पीसी म्हणजे पेरेंटल कस्टडी मिळाल्याचे माझे मत आहे. मुलांना काय वाटतं? त्यांना कोणत्या शाळेत जायचं आहे? त्यांच्या आवडीनिवडी कोणत्या? यांचा साकल्याने विचार न करता मुलांच्या आयुष्याचं सगळं काही जणू आपल्याला कळतं, अशा मस्तीत गुर्मीत असलेले पालक मुलांच्या आयुष्याचे जवळपास सगळे निर्णय पालक मुलांच्या परस्पर घेतात. मुलांच्या आवडीनिवडी काय आहेत? हे अनेक पालकांच्या गावी नसते. मुलांचं करिअर निवडताना पालक प्रचंड गोंधळलेले आहेत. संभ्रमात आहेत. ते इतरांचे कोणाचे तरी अनुकरण करताना दिसतात. यातून मुलांचे त्रास आणखी वाढत आहेत.
पालकांकडे पैसे आहेत म्हणून नीट किंवा जेईईसारख्या परीक्षांच्या तयारीसाठी शिकवणी लावली जाते. दहावीत मिळालेले भरमसाट मार्क्स अकरावी-बारावी विज्ञान आणि त्यापुढील प्रवेश परीक्षेत फारसे कामाला येत नाहीत. आपली मुलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा आयआयटीमध्ये जाण्याची स्वप्नं यांनी उराशी बाळगलेली असतात. आपल्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आकांक्षा मुलांकडून पूर्ण करून घेण्याच्या उद्देशाने महागडे क्लास लावले जातात. गुंतवणूक आणि परतावा अशी मार्केटची भाषा पालक मुलांसाठी वापरताना दिसतात. पैसे खर्च केले तर मार्क्स मिळायला हवे असा आग्रह असतो.
अनेक मुलांना गुंतागुंतीचे किचकट प्रश्न सोडवता येत नाहीत. संकल्पना स्पष्ट नसतात. शिकवलेलं समजलेलं नसलं तरी परीक्षा कठोर वातावरणात होतात. अशा वेळी मुलांच्या नाकी नऊ येतात. तीव्र स्पर्धा. आई-बाबांनी पैसे खर्च केलेले आहेत. अपेक्षित मार्क्स मिळत नाहीयेत. आई-वडिलांना मार्क्स पाहिजेत. मौनातला आकांत मुलांना असह्य होतो आहे. अभ्यासात मन लागत नाही. तीव्र चिंता सतावत असते. मनात भीती घर करून बसलेली असते. आतल्या आत प्रचंड खळबळ सुरू असते. रेसच्या घोड्यावर लावतात तसे पालकांनी मुलांवर पैसे लावलेले असतात! त्यांना केवळ यश हवं असतं! मूल म्हणजे मार्क्स मशीन नाहीयेत याचं भान हरपून गेले आहे.
परिणामी मुलं त्रासात आहेत ताणात आहेत. त्यांची विचित्र कोंडी झाली आहे. सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी मनोवस्था मुलं अनुभवत आहेत… वरवर पाहता सगळं काही ठीक चाललं आहे असं वाटत असतं तरी पालकांना मुलांच्या अंतरंगातला कल्लोळ आणि त्रास यांचा अंदाज येत नाही. प्रेशर कुकरला शिटी असते. मुलांच्या डोक्याला तशी सोय नाहीये… न झेपणाऱ्या विचारांची कोंडलेली वाफ आतून धडका मारत असते, याची पुसटशी कल्पना पालकांना असते का…?
सांगलीत मुख्याध्यापक असलेल्या बापाला लेकीपेक्षा तिच्या शिक्षणावर खर्च केलेले पैसे महत्त्वाचे वाटत होते! गुंतवणूक करूनही अपेक्षित रिटर्न्स मिळाले नाहीत म्हणजे आपलं नुकसान झाल्यासारखं पालकांना वाटत असेल तर हा आजार किती गंभीर स्वरूपाचा आहे याचा आपल्याला अंदाज येतो. हा बाप माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होता. अशा मानसिकतेचा मुख्याध्यापक म्हणजे तिथल्या मुलांचीदेखील चिंता वाटते…
आपण इतका खर्च करतो तर मुलांनी टॉपर म्हणून मार्क मिळवत राहावे, असे पालकांना वाटते. इतकं सोपं असतं का खरेच हे सगळं? आपल्या मुलांची क्षमता किती आहे? याचा विचार मागे पडलेला आहे. गोष्टी लादल्या गेल्याने त्यातला आनंद संपलेला असतो. मुलं दुबळी आणि पालक सबळ असतात. निमूटपणे सहन करण्याशिवाय मुलांपुढे अन्य पर्याय नसतो. गुमान गप्प बसून बिचारी मुलं सगळं काही सहन करतात. आतली खळबळ न सांगता. अनेकदा या मानसिक ताणतणावातून मुलं नैराश्याच्या फेऱ्यात सापडतात. NEET आणि JEE या परीक्षांच्या तयारीसाठी राजस्थानमधल्या कोटा येथे गेलेल्या मुलांपैकी अनेक मुलं कमी मार्क्स घेऊन येतात. तेव्हा त्यांना आपण जणू काय आपल्या पालकांचे गुन्हेगार आहोत, असा अपराधगंड छळत असतो. कोटा शहरात मुलांच्या होणाऱ्या आत्महत्या गंभीर चिंतेचा विषय असूनही अनेक मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय पालक मुलांना या चरकात आपणहून ढकलताहेत. या चरकात अडकलेल्या अनेक मुलांमधला जीवनरस संपून त्यांचं पार चिपाड होऊन जातं. दिवसेंदिवस ही समस्या आणखीन उग्ररूप धारण करते आहे. मुलांच्या यशात स्वतःचे यश शोधणारे पालक आपल्या पोटच्या पोरांशी क्रूर वागू लागलेत. आयआयटीमधून शिक्षण लाखांचे पॅकेज किंवा डॉक्टर होऊन दवाखाना थाटणार आणि मग सोंगाढोंगात लग्न कार्य… कथित सामाजिक प्रतिष्ठेपायी आईवडील कसे बहकत चाललेत, याचं प्रत्यंतर सांगलीसारख्या मन विदीर्ण करणाऱ्या विदारक घटनांनी येतं.
जेईई, नीट या पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाले तर आणि तरच आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य आहे असे बहुसंख्य पालकांना वाटू लागले आहे. यातूनच तुलना केली जाते. ताण असह्य होऊन किंवा कथित अपयशाची भीती वाटल्याने, मनावर प्रचंड दडपण आल्यामुळे ‘आई बाबा मला माफ करा…’ अशी नोट लिहून मुलं आत्महत्या करतात अशा बातम्या यायच्या. आता तर पालकच मुलांच्या हत्या करायला लागलेत. करिअरच्या अत्यंत ठोकळेबाज कल्पना अंगी भिनलेले पालक धोकादायक बनले आहेत. हे पालक मुलांच्या जीवनातला आनंद हिरावून घेत राहणार.
मातापित्यांच्या लैंगिक सुखाच्या प्रेरणेतून, नैसर्गिक गरजेतून मुलांचा जन्म होतो. पालकत्व ही जबाबदारी आहे. ती समजून उमजून विचारपूर्वक करायची कृती आहे हे किती पालक लक्षात घेतात? पालक व्हायच्या आधी हे सगळं लग्न झालेल्या दाम्पत्याला नीट समजून सांगितले पाहिजे. आपल्या समाजात पालकत्वाचे कोणतेही शिक्षण नाही. पहिल्या वर्गात प्रवेश घेताना शाळा आणि माध्यम निवडण्यापासून करिअरच्या निर्णायक टप्प्यावर पोहोचेपर्यंत निर्णय पालक घेतात. पालकांच्या मनातला गोंधळ, संभ्रम नजरेस पडत राहतो. मुलांच्या भविष्याची प्रामाणिक काळजी पालकांना वाटते हे वास्तव नजरेआड करता येत नाही. आपल्या मुलांचं काय होईल? अशी असुरक्षितता पालकांच्या मनात असते. काहीशी ती स्वाभाविकही आहे. अलीकडे मात्र पालकांचं ताळतंत्र सुटत चाललं आहे. या गोंधळाचे वाईट परिणाम मुलांवर होताहेत. याबाबत समाजात जाणीवजागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
शासकीय पातळीवर काही होईल अशा अपेक्षा करणे गैर आहे. वाढत चाललेला स्क्रीन टाईम, अकॅडमीक ओव्हरलोड, आकर्षणातून निर्माण होणाऱ्या लैंगिक समस्या, हिंसा आणि व्यसनांचे आकर्षण अशा अनेक गोष्टी आहेत. मुलं ताणात आणि त्रासात आहेत. प्रत्येक माध्यमिक शाळेत आणि महाविद्यालयात समुपदेशकाची नेमणूक करण्याची मागणी करूनही सरकार दुर्लक्ष करत आले आहे. कारण अकरावी बारावीचे वर्ग ओस पडलेले आहेत आणि क्लासेस ओसंडून वाहत आहेत. प्रवेश परीक्षांना सामोरे जाताना मुलांच्या मनावर मेंदूवर किती ताण येतो, त्यांची मनःस्थिती कशी असते? एकूण शिक्षण, करियर आणि एकूण मानसिक आरोग्याबाबत एखादा अभ्यास केल्यास यातलं भीषण वास्तव समोर येईल.
खलिल जिब्रान म्हणतो “तुमची मुलं तुमच्या पोटी जन्माला आलेली असली तरी ती काळ प्रवाहाची अपत्ये आहेत. तुमचे विचार तुमच्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत.” वास्तविक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून मुलांचा आदर पालकांनी करायला हवा. मात्र अलीकडे पालक मुलांचे मालक झाल्यासारखे वागताना दिसतात.
- भाऊ चासकर
पालकत्व #समुपदेशन #स्ट्रेस #मानसिक_आरोग्य #शिक्षण #करिअर
(हा मजकूर आपण नावासह शेअर करू शकता.)
AG/ML/MS