हिंदी सक्ती विरोधार कवींकडून पुरस्कार वापसी

मुंबई, दि. २३ : राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा लादणाऱ्या सरकार विरुद्ध राज्यातील साहित्य आणि सामाजिक वर्तुळात असंतोष निर्माण झाला आहे. लेखक, साहित्यिक आणि भाषाप्रेमी विविध माध्यमांतून हिंदीसक्तीचा विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर कृतीशिल भूमिका घेत लेखक, कवी हेमंत दिवटे यांनी शासनाचा पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे, तर सचिन गोस्वामी आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सरकारच्या निर्णयावर टीका केली आहे. लेखक, कवी हेमंत दिवटे यांनी या निर्णयाच्या निषेधार्थ महाराष्ट्र शासनाने दिलेला पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली.
“हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून लादण्याच्या निर्णयाचा निषेध म्हणून मला पॅरानोया या कवितासंग्रहासाठी मिळालेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार रकमेसकट परत करत आहे. सरकारने निर्णय मागे घेतला तरच मी माझा निर्णय मागे घेईन,” असं हेमंत दिवटे म्हणाले आहेत.
शासनाच्या निर्णयामुळे पालकांमध्येही नाराजी पसरली आहे. शासनाने पहिलीपासून हिंदी भाषा तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्याला पालकांचा विरोध आहे. “सरकारने 20 विद्यार्थी जमले तर पर्याय देऊन शब्दच्छल केला. हिंदी भाषा शिकण्याला विरोध नाही तर मुलं थोडी मोठी झाली की 5 वी नंतर हिंदी शिकवा. आमचा विरोध प्राथमिक शिक्षणात समावेशाला आहे. सरसकट हिंदी भाषेला नाही,” असे सचिन गोस्वामी म्हणाले.