‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ सर्वांना देण्याची चूक झाली !

पुणे प्रतिनिधी– ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू करतांना निकष पडताळण्यासाठी पुरेसा कालावधी न मिळाल्याने सरकारी नोकरी असलेल्या, वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांहून अधिक असलेल्या, तसेच घरी चारचाकी गाडी असलेल्या लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. सर्वांना लाभ देण्याची चूक झाली, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. सिंचननगरमध्ये आयोजित केलेल्या ‘पुणे कृषी हॅकेथॉन’च्या उद्घाटनानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे निकष पडताळण्याठी सरकारकडे अल्प कालावधी होता. दोन ते तीन महिन्यांत निवडणुका होत्या. अडीच लाख रुपयांहून न्यून उत्पन्न असणार्यांना या योजनेचा लाभ देण्याचे ठरले होते. त्यामुळे निकषात बसणार्यांनी अर्ज करण्याचे आवाहन सरकारने केले होते; मात्र निकषात न बसणार्यांनीही अर्ज करून लाभ घेतला. त्यांच्याकडून पैसे काढून घेणार नाही, तसेच कारवाईही करणार नाही, असे सांगून ‘खरोखरच ज्या लाभार्थ्याला लाभ मिळायला हवा, त्या लाभार्थ्यांसाठी ही योजना चालू रहाणार आहे’, असे पवार यांनी स्पष्ट केले.