राष्ट्रवादी अजित पवार गटाचा ठाण्यात जनता दरबार

मुंबई, दि 15:
ठाणे शहरात भाजप, शिवसेना शिंदे गटाच्या जनता दरबारवरून राजकारण रंगले असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाने ठाण्यात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
बुधवारी अजित पवार गटाचे सरचिटणीस नजीब मुल्ला यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन
केले आहे. या जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.
जेव्हा मी नगरसेवक होतो, तेव्हा आठवड्यातील चार दिवस लोकांना महापालिकेत भेटत होतो. पण एका आमदाराच्या पोटदुखीने महापालिकेतील गट नेत्यांची कार्यालय बंद झाली, परिणामी
यात नागरिकांशी संवाद साधता येत नव्हता, असे त्यांनी यावेळी सांगितले. या आमदाराने तक्रार करून पक्ष कार्यालय बंद करण्याकरिता विधानसभेत प्रश्न उपस्थित केले. त्यातून कार्यालय महापालिकेने बंद झाल्याचा आरोप त्यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता केला.
पुढील आठवडयात बुधवारी महापालिकेत आयुक्तांबरोबर बैठक आहे. या बैठकीत विविध महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली जाणार आहे, यात कळवा येथील २५ हजारपेक्षा जास्त घरांना मालमत्ता कर नाही. त्यांना मालमत्ता कर लावण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून लोकांची कामे होत आहे.
त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम
करण्याचा माझा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले .
दरम्यान यापूर्वी भाजपकडून वनमंत्री गणेश नाईक यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन केले होते. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिंदे सेनेच्या वतीने माजी महापौर अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेते मनोज शिंदे जनसंवादाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या जाणून घेत ते सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. आता त्या पाठोपाठ अजित पवार गटाने ही जनसंवाद सुरू केला आहे.
नागरिकाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही महापालिका आयुक्तांकडे जागेची मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी आणि शुक्रवारी आम्हाला जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मला बुधवारी महापालिकेतील कै. धर्मवीर आनंद दिघे सभागृहात जागा मेटू शकते. त्यानुसार बुधवारी मुंब्रा कौसा, कळवा येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. असे यावेळी नजीब मुल्ला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. KK.MS