मान्सून अरबी समुद्रात दाखल

भारताच्या हवामान विभागाने (IMD) मान्सूनच्या अरबी समुद्रात प्रवेशाची केल्याची माहिती दिली आहे . यंदा मान्सून अपेक्षेपेक्षा अधिक वेगाने पुढे सरकत असून तो आंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात आधीच पोहोचला आहे. पुढील काही दिवसांत तो मालदीव आणि मध्य बंगालच्या उपसागरातही प्रवेश करेल अशी शक्यता आहे. मान्सूनच्या आगमनामुळे वातावरणात ढगाळ स्थिती निर्माण झाली असून तापमानात घट दिसून येत आहे. पश्चिमेकडील वारे मजबूत होत असून समुद्राच्या पृष्ठभागावर २० नॉट्सच्या वेगाने वाहत आहेत, जे मान्सूनच्या प्रवासाला चालना देत आहेत.
येत्या २७ मेपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर महाराष्ट्रात ७ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून आज अरबी समुद्र, मालदीव, बंगालचा उपसागर आणि अंदमानच्या काही भागात पुढे सरकला आहे. के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील ४ ते ५ दिवसांत मध्यम ते तीव्र गडगडाटासह जोरदार वारे आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेघगर्जनेदरम्यान बाहेर पडणे टाळा. झाडांना आश्रय म्हणून घेऊ नका. सुरक्षिततेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, असे आवाहनही नागरिकांना करण्यात येत आहे.
IMD च्या अंदाजानुसार यंदाचा मान्सून सरासरीपेक्षा अधिक असेल आणि 105% सरासरी पर्जन्यमान अपेक्षित आहे, ज्यामुळे शेती आणि जलसंपत्ती व्यवस्थापनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. पुढील काही दिवसांत मान्सून मालदीव आणि कोमोरीन प्रदेशात पोहोचण्याची शक्यता आहे, तर कोकण आणि केरळ किनारपट्टीवर लवकरच पावसाची सुरुवात होण्याची अपेक्षा आहे.