राष्ट्रीय प्रसारमाध्यम दिन : प्रसार माध्यमांचे बदलते स्वरूप

राधिका अघोर
प्रसार माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखली जातात. लोकशाही ज्या स्तंभांवर उभी आहे, तोलून धरली गेली आहे, त्यात एक स्तंभ मीडिया म्हणजेच प्रसार माध्यमे आहेत. इतकी महत्वाची भूमिका आणि इतके महत्वाचे स्थान असलेल्या प्रसार माध्यमांची आजची स्थिती बघता, केवळ या क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी नाही, तर या क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यासाठी, त्यावर मंथन करण्यासाठी आज राष्ट्रीय प्रसारमाध्यम दिन साजरा करण्याची गरज आहे. आज म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय प्रसार माध्यम दिन साजरा केला जातो. याच दिवशी 1966 साली, प्रसारमाध्यमांची सर्वोच्च नियामक संस्था, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ने आपल्या कार्याचा शुभारंभ केला होता. त्याचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतात मुद्रित प्रसिध्दी माध्यमे म्हणजे वृत्तपत्रे, पक्षिके, मासिके आहेत. आणि स्वातंत्र्यकाळात त्यांनी अत्यंत ज्वलंत पत्रकारिता करत स्वातंत्र्य आंदोलनात मोठी भूमिका बजावली होती. स्वातंत्र्यानंतर ही अत्यंत ताकदवान आणि समाज घडवण्याची ताकद असलेली संस्था/ व्यवस्था म्हणून प्रसिद्धी माध्यमांना सन्मान मिळाला. त्यांनीही पत्रकारितेचे ब्रीद आणि जबाबदारी ओळखत आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली.
आजही, सामाजिक जनमत तयार करणे, विकासाला चालना देणे, अशा तत्वांसाठी माध्यमे जबाबदार असतात, असे मानले जाते. देशाच्या, समाजाच्या प्रगतीचे एक अत्यंत शक्तिमान अस्त्र म्हणून माध्यमांनी तटस्थ आणि पूर्वग्रह विरहित वार्तांकन करणे, जनतेला जागृत आणि सुशिक्षित करतात. प्रसार माध्यमांचे मुख्य कर्तव्य, जनतेला माहिती देऊन ,त्यांना जागृत करणे हे आहे. त्यासाठी योग्य ती माहिती पोहचवण्याची धधाडी आणि चिकाटी, ती लोकांना शुद्ध स्वरूपात, जशी आहे तशी सांगण्याचा तटस्थपण आवश्यक आहे. गेली अनेक वर्षे माध्यमे हे काम अविरत करत आहेत. त्यांच्या ह्या कार्याचा गौरव करण्यासाठीच हा दिवस साजरा केला जातो. यंदाच्या राष्ट्रीय प्रसारमाध्यम दिनाची संकल्पना आहे, प्रसार माध्यमांचे बदलते स्वरूप – यात माध्यमांचा मुद्रित पासून इलेक्ट्रॉनिक आणि आता डिजिटल, त्याचाही एक भाग म्हणजे सोशल मीडिया. असे बाह्य स्वरूप बदलले आहे, आधी केवळ काही लोकांच्या हातात असलेली माध्यमे आता लोकांपर्यंत पोहोचली आहे. लिहिण्याची क्षमता आणि चित्रीकरण करण्याची साधने असलेली कोणीही व्यक्ती आता पत्रकराचाचे काम करत असते. मात्र, दुर्दैवाने माध्यमांचे जेवढे लोकशाहीकरण झाले आहे, त्या प्रमाणात वाढलेल्या जबाबदारीचे त्यांना भान नाही. अतीपणामुळे माध्यमे सवंग होत चालली आहेत. आपले कर्तव्य विसरून स्वतःला कोणाच्या तरी दावणीला बांधून त्यांचीच री ओढत अजेंडा पत्रकारिता केली जाते आहे. माध्यमांनी चांगली किंवा वाईट अशी भूमिका घेणं यात गैर काही नाही. पण ती घेतांना त्यात आपले स्वार्थ चिकटवले की प्रत्येक गोष्टीला योग्य ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. यात पत्रकारांची अवस्था माकडासारखी होते. आणि प्रसार माध्यमे केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून उरतात. हे टाळायचे असेल तर आजच ह्या क्षेत्रातल्या लोकांनी भानावर येणे गरजेचे आहे. राष्ट्रीय प्रसारमाध्यम दिनानिमित्त आज नवी दिल्लीत एक विशेष कार्यक्रम होत आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव या कार्यक्रमात मार्गदर्शन करतील आणि उत्तम पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार ही देतील. या क्षेत्राशी सबंधित सर्वांना प्रसिध्दी माध्यम दिनाच्या शुभेच्छा !