१५ मिनिटे उशीर झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांचा अर्धा दिवस कापला जाणार

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कार्यालयात उशीरा पोहोचणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी केंद्राच्या कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागाने आता नवे निर्देश काढले आहेत. देशभरातील केंद्र सरकारच्या कार्यालयातील सर्व ज्येष्ठ अधिकारी, कर्मचारी यांनी सकाळी ९.१५ पर्यंत कार्यालयात हजर व्हावे आणि बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावावी, असे आदेश देण्यात आले आहेत. जर निहित वेळेत कर्मचारी कार्यालयात हजर झाले नाहीत, तर त्यांचा हाफ डे लावण्यात येईल, असेही यात म्हटले आहे.
देशातील केंद्र सरकारी कर्मचाऱ्यासाठी सकाळी ९ ते संध्याकाळी साडेपाच अशी कामाची वेळ आहे. अनेकदा सरकारी बाबू हे आरामात आपल्या कार्यालयात येतात. त्याचप्रमाणे कार्यालयीन वेळेच्या आधीही कार्यालयाबाहेर पडतात. यामुळे केंद्र सरकारने आता याबाबतीत आधीपासून असलेल्या नियमांची सरकारी कठोरपणे अंमलबाजवणी करणार आहे.
कोरोनाकाळात बंद करण्यात आलेली बायोमेट्रिक हजेरीही अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र केंद्र सरकारच्या या नियमाविरोधात काही ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही बरेच वेळा उशिरापर्यंत कार्यालयात असतो. कधी कधी कार्यालयीन काम घरीही घेऊन जातो. त्यामुळे या नियमाचा आम्हाला दुहेरी फटका बसेल. ज्यांना कामानिमित्त कार्यालयाच्या बाहेर जावे लागते, त्यांनाही या नियमाचा फटका पडणार असल्याचेही या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
SL/ML/SL
22 June 2024