आध्यात्मिक नगरी नाशिकमधून संतांनी केली निवडणुकीची तयारी

नाशिक, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आध्यात्मिक नगरी म्हणून नाशिकची ओळख आहे. याच नाशिकमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसाठी चार महाराज लोकसभा निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. यात महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज, महंत सुधीरदास महाराज, स्वामी कंठानंद आणि अनिकेत शास्त्री देशपांडे यांचा समावेश आहे. या चारही महाराजांनी निवडणूक लढवण्याची इच्छा जरी व्यक्त केली असली तरी ते कुठल्या पक्षातून की अपक्ष उमेदवारी लढवणार याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे.
प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिकमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. दर बारा वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा होतो. या काळात देशभरातून हजारो साधू, महंत तसेच कोट्यवधी भाविक येत असतात. त्यामुळे प्राचीन आणि धार्मिक नाशिकचा कायापालट करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी लोकसभा निवडणूक नाशिकमधूनच लढवावी, अशी मागणी नाशिकच्या महंतांनी केली होती. मात्र त्याबाबत अद्याप भाजपाकडून कुठलंच स्पष्टीकरण आलं नाही.
अशातच नाशिक लोकसभा निवडणुकीत आपलं भवितव्य आजमावण्यासाठी चार महाराजांनी इच्छा व्यक्त केली आहे. नाशिक लोकसभा निवडणूकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने महत्वाचे ठरलेला नाशिक लोकसभा मतदार संघ पुन्हा एकदा चर्चेत आला असून, सर्वच राजकीय पक्ष त्यावर दावा ठोकत असतांना जय बाबाजी भक्त परिवाराचे सर्वेसर्वा आणि जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी म्हणून परिचीत शांतीगिरी महाराज यांनी नाशिक येथून लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी करणार असल्याचे सांगितले.
शांतीगिरी महाराजांच्या या भूमिकेने भाजपाची मात्र अडचण होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत नाशिक लोकसभेच्या जागेवर शिवसेनेचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत. मात्र राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर आता ही जागा भाजपाला सोडली जाणार, अशी चर्चा आहे. मात्र भाजपाकडून इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने उमेदवारीची शक्यता नसल्यानेच शांतीगिरी महाराजांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.
ML/KA/SL
31 Jan. 2024