अमळनेर येथे ३ – ४ फेब्रुवारीला अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन

मुंबई दि.12(एम एमसी न्यूज नेटवर्क) : साने गुरुजीची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये येत्या 3 व 4 फेब्रुवारी रोजी 18 वे अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे.या संमेलनाचे उद्घाटन जयपूर (राजस्थान) येथील सुप्रसिद्ध विद्रोही कवी संपत सरल यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी यांनी प्रेस क्लब मध्ये बोलताना दिली. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्याम पाटील, मुख्य संयोजक डॉ. लिलाधर पाटील, मुख्य समन्वयक प्रा. अशोक पवार व निमंत्रक रणजित शिंदे, उपाध्यक्ष अर्जुन बागुल, कोकण विभाग प्रमुख सुदीप कांबळे उपस्थित होते.
आता पर्यंत मुंबई, कोल्हापूर, सोलापूर, अमरावती, नंदुरबार, सिंधुदुर्ग, धुळे इ. ठिकाणी विद्रोही साहित्य संमेलने आयोजित केली आहेत. महाराष्ट्रातील आयु, बाबुराव बागुल, वाहरू सोनवणे, डॉ. यशवंत मनोहर, डॉ. अजीज नदाफ, आत्माराम राठोड, तारा रेड्डी, तुलसी परब, जयंत पवार, डॉ. आ. ह. साळुंके, उर्मिलाताई पवार आदी सर्जनशील, प्रगतीशील साहित्यिक नाटककार, कवी आदींनी संमेलनाची अध्यक्षपदे भूषवित विद्रोही साहित्य संस्कृतीचा आवाज आपल्या अध्यक्षीय मांडणीतून बुलंद केला आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मार्क्सवादी विचारवंत डॉ. एजाज अहमद, डॉ. उमा चक्रवर्ती, मा. सुशिला टाकीर, आयु, जयंत परमार, गौहर रझा, अन्वर चिस्ती, रसिका आगाशे, आदींनी विद्रोही साहित्य संमेलनांचे उद्घाटन करून विद्रोही जागरात आपला सहभाग नोंदविला आहे. सुखदेवसिंग सिरसा, अशोक पांडे इत्यादींननी परराज्यातून सहभागी होत विद्रोही भातृभाव वृध्दिंगत केला आहे.
यंदाचे १८ वे विद्रोही साहित्य संमेलन अमळनेर, जि. जळगाव मध्ये भरविले जाणार आहे. अमळनेरची भूमी ही ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ असा खरा प्रेममय धर्म सांगत अन्यायाच्या विरोधात ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान… असे अजरामर गीत लिहून मंदिर प्रवेशासाठी उपोषण आंदोलन करणाऱ्या साने गुरुजींची कर्मभूमी आहे. यंदाचे हे संमेलन आम्ही प्रेममय सत्य धर्म आणि समता, स्वतंत्र, बंधुत्व या मूल्य समर्थनार्थ या आशयसूत्रावर (थीम) आधारित घेत आहोत, धुळे रोडवरील आर. के. नगरच्या समोरील भव्य प्रांगणात हे संमेलन होणार असून दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात ३ परिसंवाद, २ कवी संमेलने, गटचर्चा, कथाकथन, युवा मंच, बालमंच, विचार दिंडी, नाटक, चित्रप्रदर्शन इ. असणारी आहे. देशाच्या केंद्रसत्तेत मोदी-शहा सरकारच्या निमित्ताने अघोषित आणीबाणी सुरू करून संविधानाने सर्व नागरिकांना बहाल केलेल्या मूलभूत हकांचाच गळा घोटण्यास सुरुवात केली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची सवॉच गळचेपी सुरू आहे. कधी लाभाच्या पदांची अमिष तर कधी दहशत दडपशाहीच्या मार्गाने-धमकावत विषमतावादी संस्कृती पसरवली जात आहे. प्रसार माध्यमांवरील दडपशाहीबद्दल अधिकच वाढली आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ त्याविरुध्द आवाज उठवित आहे. लोकशाही मूल्यांसाठी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी कायम संघर्षरत आहे.असे प्रा. परदेशी यांनी सांगितले.
SW/KA/SL
12 Jan. 2024