अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीत ५ मराठी इंजिनिअर्सचा हातभार
अयोध्या, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 22 जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाची उत्सुकता आता देशभरातील रामभक्तांना लागून राहीली आहे. दरम्यान मराठी माणसासाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मंदिराच्या उभारणी करणाऱ्या 8 मुख्य इंजिनीअर्स पैकी 5 महाराष्ट्रातील आहेत.
श्रीराम जन्मभूमी न्यासाने अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीची जबाबदारी 8 मुख्य प्रकल्प व्यवस्थापकांकडे सोपवण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील डॉ. जगदीश आफळे (पुणे), जगन्नाथ गुळवे (संभाजीनगर), सुभाष चौधरी (जळगाव), अविनाश संगमनेरकर (नागपूर) आणि गिरीश सहस्त्रभोजनी (गोवा) यांचा समावेश आहे. याशिवाय उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि मदुराईमधील तीन इंजिनीअर्स आहेत. त्याच बरोबर टाटा कन्सल्टन्सीतर्फे राधेय जोशी (पुणे), एल अँड टीतर्फे सतीश चव्हाण (चाळीसगाव), साईट सिक्युरिटी मॅनेजर संतोष बोरे (बोरिवली) यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभत आहे.
राम मंदिर प्रकल्पामध्ये प्रत्यक्ष मंदिर उभारणी आणि परिसराचे विकसन हे दोन स्वतंत्र टप्पे आहेत. राम मंदिराचे 22 जानेवारीला पहिल्या टप्प्यात उद्घाटन होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण व्हायला किमान दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. यासाठी नियोजनानुसार काम सुरू आहे.
SL/KA/SL
29 Dec. 2023