ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर बंदी

नवी दिल्ली, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशांतर्गत वापरासाठी साखरेची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरीजना पुरवठा वर्ष 2023-24 (डिसेंबर 2023 ते नोव्हेंबर 2024) मध्ये इथेनॉल उत्पादनासाठी उसाचा रस वापरणे टाळण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल. आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, याबबात ग्राहक व्यवहार आणि अन्न पुरवठा मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग देशातील साखरेचे उत्पादन, विक्री आणि उपलब्धता यावर लक्ष ठेवतो. ज्यामुळं स्थिर किंमतीवर साखरेची उपलब्धता सुनिश्चित होते.
सरकारनं 2023-24 या काळात साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरींना ऊसा रसापासून इथेनॉल बनवू नये असे आदेश दिले आहेत. हा आदेश तात्काळ लागू झाला आहे. परंतु बी-हेवी मोलॅसेसपासून इथेनॉलचा पुरवठा करण्यासाठी तेल विपणन कंपन्यांकडून प्राप्त झालेल्या आदेशांसाठी इथेनॉलचा पुरवठा सुरु राहणार आहे. या निर्णयाबाबत मंत्रालयाने पेट्रोलियम मंत्रालयालाही कळवले आहे.
सरकारच्या या निर्णयामुळं साखर उत्पादक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. बलराम चिनी 6.60 टक्के, दालमिया भारत 6.08 टक्के, बजाज हिंदुस्थान 5.41 टक्के, डीसीएम श्रीराम 5.80 टक्के घसरणीसह बंद झाले आहेत.
भारत सरकार ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीच्या उत्पादनावर बंदी घालू शकते अशा बातम्या येताच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत न्यूयॉर्क एक्सचेंजमध्ये साखरेचे भाव सुमारे 8 टक्क्यांनी घसरले आहेत. या निर्णयाचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येईल, असे मानले जात आहे. साखरेचे भाव खाली येण्याची शक्यता आहे.
SL/KA/SL
7 Dec. 2023