राहुरी येथील शेतकरी प्रकल्प ठरला देशात उत्कृष्ट
अहमदनगर, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या भा.कृ. अ.प.-शेतकरी प्रथम प्रकल्पास पालमपूर, हिमाचल प्रदेश येथे नुकत्याच झालेल्या वार्षिक राष्ट्रीय कार्यशाळेत उत्कृष्ट प्रकल्प पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेचे कृषी विस्तार उपमहासंचालक डॉ. यु.एस. गौतम यांच्या हस्ते प्रकल्पाचे सह समन्वयक डॉ. रविंद्र निमसे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या प्रसंगी कृषी विस्तारचे सहाय्यक महासंचालक डॉ. आर.आर. बर्मन, पालनपूर येथील कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डि.के. वत्स, विस्तार शिक्षण संचालक डॉ. नवीन कुमार आणि नवी दिल्ली येथील कृषी विस्तारचे माजी उपमहासंचालक डॉ. किरण कोकाटे उपस्थित होते.
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा शेतकरी प्रथम प्रकल्प देशात वीस राज्यातील 52 कृषी विद्यापीठे आणि भा.कृ.अ.प. केंद्रावर राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात देशभरातील 50 हजार शेतकरी सहभागी आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे गेल्या सहा वर्षापासून शेतकरी प्रथम प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात राहुरी तालुक्यातील चिंचविहिरे, कणगर, तांभेरे, कानडगाव या गावांची निवड करण्यात आलेली आहे.
या प्रकल्पाद्वारे निवडलेल्या गावांमध्ये तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रसार करुन एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेलद्वारे शेतीमध्ये शाश्वत उत्पादन वाढवून शेतकर्यांचे जीवनमान उंचविण्याचा उपक्रम यशस्वीरीत्या होत आहे. सन 2017-18 पासून 2928 पीक प्रात्यक्षिके, 34 शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम, 7 शेतकरी अभ्यास दौरे, 20 शेतकरी-शास्त्रज्ञ चर्चासत्र, 36 प्रक्षेत्र भेटी आणि 34 गट चर्चाद्वारे कृषी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे प्रसार केला जात आहे.
ML/KA/SL
2 Dec. 2023