ऊस उत्पादक शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी खर्डा-भाकरीवर
सांगली, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी जयसिंगपूरच्या मुख्य मार्गावर ऐन दिवाळीत १६ नोव्हेंबरपर्यंत ठिय्या आंदोलन आरंभले आहे. ऊस संघर्षाला धार वाढवण्यासाठी हे आंदोलन होत आहे.
यावर्षीचा ऊस गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. राज्यात इतरत्र ऊस गाळप सुरू झाले असले तरी कोल्हापूर – सांगली जिल्ह्यातील गाळप थंडावले आहे. याला माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेलं ऊसदराचं आंदोलन कारणीभूत ठरलं आहे.
गतवर्षी साखर आणि इथेनॉल विक्रीतून चांगली कमाई झाली असल्यानं गेल्या हंगामातील ऊसाला प्रति टन ४०० अधिक
अधिक रुपये द्यावेत, ही शेट्टी यांची मुख्य मागणी आहे. त्यासाठी त्यांनी कोल्हापूर – सांगली जिल्ह्यामध्ये २२ दिवसांची आक्रोश पदयात्रा काढली. साखर कारखान्यांच्या अध्यक्षांना निवेदन देऊन ही मागणी पूर्ण करावी; अन्यथा धुराडे पेटवू दिले जाणार नाहीत, असा इशारा देण्यात आला होता.
कोल्हापुरातील साखर कारखान्यांनी यावर्षीच्या गळीत हंगामासाठी प्रति टन ३००१ ते ३२०० रुपये इतकी रक्कम देण्याचे जाहीर केले आहे. ते शेट्टी यांना मान्य नाही. त्यांनी ३५०० रुपये देण्याची मागणी ऊस परिषदेमध्ये केली. ऊस परिषदेनंतर आंदोलनाची तीव्रता कमी होईल असे वाटत होते. पण शेट्टी यांनी अचानक धक्कातंत्राचा अवलंब करीत ऊस परिषदेच्या ठिकाणीच या क्षणापासून ठिय्या उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. १६ नोव्हेंबरपर्यंत हे आंदोलन चालणार आहे. याचा अर्थ ऐन दिवाळीत राजू शेट्टी यांना उघड्यावर सण करावा लागणार आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्पादन खर्चाच्या तुलनेत कारखान्यांकडून कमी दर मिळत असल्याची भावना आहे. त्यामुळे आक्रोश पदयात्रेलाही
शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.
ही परिस्थिती लक्षात घेऊन शेट्टी यांनी आंदोलनाची धग वाढवण्याची आक्रमक भूमिका घेतली आहे.ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना कारखान्यांच्या अध्यक्षांकडे धाडलं जात आहे. त्यांना कांदा भाकरीची शिदोरी देऊन आमची दिवाळी अशी फिकी झाली आहे; आता तरी दर वाढवून द्या, असं आवाहन केलं आहे.
दुसरीकडे कारखाना सुरू होत नसल्याने साखर कारखानदारांची चिंता वाढीस लागली आहे. कारखान्यावर ऊस गाळपाची यंत्रणा सुसज्ज आहे. तोडणी, वाहतूक यंत्रणा कामाला लागण्याच्या तयारीत आहे. उसदराची भडकती आंदोलने अनेक गावांमध्ये आग ओकत असल्याने अपेक्षेप्रमाणे कारखान्यामध्ये ऊस येताना दिसत नाही. शेजारच्या कर्नाटकात साखर कारखाने सुरू झाले आहेत. त्या राज्यात ऊस जाण्याची भीती आहे. हंगामाचे आर्थिक गणित घालता घालता दमलेल्या साखर कारखानदारांना गाळप कधी सुरू होणार याचा घोर लागला आहे. This year’s Diwali of sugarcane farmers is on rough bread
ML/KA/PGB
10 Nov 2023