पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस

सांगली/ कोल्हापूर दि ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पश्चिम महाराष्ट्रात आज सकाळी मध्यम स्वरूपाचा अवकाळी पाऊस पडला. यामुळे काढणीला आलेल्या अनेक पिकांचे नुकसान झाले असून त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.
सांगली जिल्ह्यात आज पहाटे पासून अवकाळी पाऊसाला सुरुवात झाली. कालपासूनच सांगली शहरात आणि जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण होते. आज पहाटेपासून मात्र पाऊस पडत आहे. शिराळा, इस्लामपूर, पलूस, तासगाव, आटपाडी या ग्रामीण भागातही पाऊस पडत आहे.
काढणीला आलेल्या भात पिकाचे आणि फुले येत असलेल्या तसेच कोवळे मणी तयार होण्याच्या अवस्थेत असलेल्या द्राक्ष पिकाचे या अवकाळी पावसामुळे नुकसान होण्याचा धोका आहे.
कोल्हापूरातही विविध ठिकाणी पाऊस पडला.
राधानगरी, भुदरगड तालुक्यात जोरदार पाऊस झाला. आदमापुर परिसरात सुद्धा जोरदार पाऊस पडला. पावसाने अचानक हजेरी लावल्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. मळणी केलेल्या भात पिकाचे नुकसान झाले आहे.मागील दोन दिवस जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते त्यामुळे पावसाची शक्यता दिसत होती, आज प्रत्यक्षात त्याने हजेरी लावत पिकांचे नुकसान केले.
आज पहाटे पासून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील काही गावात पावसाने जोरदार हजेरी लावली. पंढरपूर तालक्यातील अनवली, मंगळवेढा तालुक्यातील माचणुर, बठान, ब्रह्मपुरी या परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. ज्वारी उत्पादन साठी प्रसिद्ध असलेल्या या पट्ट्यात पडलेला पाऊस ज्वारी साठी लाभदायक ठरू शकतो.
SL/KA/SL
8 Nov. 2023