अमृत या स्वयंरोजगार योजनेची सुरुवात

ठाणे, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल गटाच्या कल्याणार्थ महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या ‘अमृत’अंतर्गत स्वयंरोजगार योजनेचा औपचारिक प्रारंभ सोहळा काल डोंबिवलीत संपन्न झाला. यावेळी अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, सदर योजनेच्या अंमलबजावणी संस्थेचे संचालक विनोद देशपांडे, योजनेचे प्रकल्प संचालक भूषण धर्माधिकारी, हेडहंटर गिरीश टिळक आणि व्यासंगी राष्ट्रवादी वक्ते सच्चिदानंद शेवडे उपस्थित होते.
यावेळी विजय जोशी यांनी आपल्या सादरीकरणातून- अमृतअंतर्गत खुल्या प्रवर्गासाठी आखण्यात आलेल्या विविध योजना आणि कार्यक्रमांची माहिती दिली. ‘या योजनेअंतर्गत राज्याच्या २०० तालुक्यांतील ८,००० लाभार्थ्यांची निवड करून त्यांना स्वतःचा उद्योग-व्यवसाय सुरु करण्यासाठी लागणारे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच उद्योजकता विकासासाठी विविध मार्गांनी पाठबळ देण्यात येणार आहे’, असे सांगत ‘समाजातील सज्जनशक्तीने या योजनेच्या पाठीशी समुदाय म्हणून उभे राहावे’, असे आवाहन देशपांडे यांनी केले.
सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचे सादरीकरण रवींद्र वारंग यांनी केले.
बीजभाषणातून शेवडे यांनी, उद्योग-व्यवसाय करणाऱ्यांना पुन्हा सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी मानसिकतेत बदल करण्याची गरज व्यक्त केली. या कार्यक्रमात आयोजित पॅनल चर्चेचे संचालन हेडहंटर गिरीश टिळक यांनी केले. या चर्चेत सायली मुतालिक, विश्वजित देशपांडे, अरविंद कोऱ्हाळकर, प्रार्थना बांखले, CA पराग प्रभुदेसाई, आणि CS सागर कुलकर्णी या उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता.
प्रतीक गाडे यांनी अमृत-अंतर्गतच्या रोजगार कार्यक्रमाचे सादरीकरण केले. भूषण धर्माधिकारी यांनी आभार व्यक्त केले.
राज्याच्या ५ प्रशासकीय विभागांतील अंमलबजावणीसाठी निवडण्यात आलेले ‘विभागीय प्रकल्प प्रमुख’ही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
ML/KA/SL
11 Sept. 2023