जरांगे यांनी केली नवीन मागणी, उपोषणावर ठाम

जालना, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सरकारच्या अध्यादेशाचे आम्ही स्वागत करतो मात्र सरकारने अध्यादेशात छोटीशी सुधारणा करण्याची मागणी करीत मनोज जरांगे यांनी घुमजाव केले असून सरसकट आरक्षण देण्याची नवी मागणी करीत तोवर उपोषण सुरुच राहणार असल्याचे जाहीर केले आहे.
सर्व मराठा समाजाने सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे मात्र वंशावळीच्या दस्तावेजा ऐवजी सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी छोटीशी सुधारणा सरकारने अध्यादेशात करावी अशी मागणी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषद घेत केली आहे.
सरकारने मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो पण जो पर्यंत अध्यादेशात सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी सुधारणा होत नाही तो पर्यंत आमरण उपोषणावर ठाम असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितलं आहे.आमच्या कडे वंशावळ नाही तसेच कित्येकांकडे पुरावे नाहीत त्यामुळे सरकारने तेव्हढी सुधारणा करावी अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. त्यांच्या या नव्या भूमिकेमुळे आरक्षणाचा तिढा कायम राहिला असून सरकार आणि प्रशासन काय भूमिका घेते ते पाहणे औत्स्युक्याचे आहे.
ML/KA/SL
7 Sept. 2023