स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतरच?
मुंबई,दि.१० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आता पावसाळ्यानंतरच होणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. कारण या बाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या या प्रकरणात गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने पुढील तारखा दिल्या जात आहेत. आज पुन्हा नवी तारीख मिळाली आहे. आता सव्वा महिन्यानंतर म्हणजेच 14 मार्च रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. त्यामुळे या निवडणूका आता पावसाळ्यानंतरच होण्याची शक्यता बळावली आहे.
कोर्टात का अडकलाय निवडणूकांचा निर्णय
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा निर्णय दोन कारणांमुळे सर्वोच्च न्यायालयात अडकला आहे. त्यातील एक कारण म्हणजे, ओबीसी आरक्षणाला मिळालेला ग्रीन सिग्नल. पण आधी जाहीर झालेल्या 92 नगरपरिषदांमध्येही हे आरक्षण मिळावं, यासाठी शिंदे सरकार कोर्टात गेलं. सोबतच महाविकास आघाडीच्या काळातली वॉर्डरचना 4 ऑगस्ट रोजी एका अध्यादेशाने या सरकारने बदलली. 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने जैसे थे आदेश दिला, त्यानंतर आतापर्यंत या प्रकरणाची सुनावणीच होऊ शकलेली नाही. आता 14 मार्च रोजी सुनावणी होत असेल तर, निवडणूकीच्या पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ लक्षात घेता पावसाळ्याआधी निवडणुका होणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
SL/KA/SL
10 Feb. 2023