प्रजासत्ताक दिन : सत्तेसोबत येणाऱ्या जबाबदारीची नागरिकांना जाणीव होईल, तो प्रजासत्ताक सुदिन.

 प्रजासत्ताक दिन : सत्तेसोबत येणाऱ्या जबाबदारीची नागरिकांना जाणीव होईल, तो प्रजासत्ताक सुदिन.

मुंबई, दि. 26 (राधिका अघोर): आज आपण आपला 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. भारताने याच दिवशी आपल्या संविधानानुसार, लोकांनी लोकांसाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी चालवलेली लोकशाही व्यवस्था अंगिकारली, म्हणून आपण हा दिवस प्रजासत्ताक किंवा गणराज्य म्हणजे ‘लोकांचं राज्य’ म्हणून साजरा करतो.

हा आपला राष्ट्रीय सण आहे. याचा अर्थ ‘एक राष्ट्र’ म्हणून भारत एकसंध लोकशाही देश असल्याची ग्वाही आपण देतो. मग आज या प्रजासत्ताक दिनी आपण या ‘देशाचे राजे’ असलेल्या लोकांविषयीच बोलले पाहिजे.

देशात खऱ्या अर्थाने प्रजेची सत्ता आहे का? इथे सत्ता म्हणजे केवळ अधिकार, वर्चस्व अभिप्रेत नाही. तर सत्तेसोबत जबाबदारीची जाणीवही असली पाहिजे. कारण जितके अधिक अधिकार, तेवढी जास्त जबाबदारी. आता देशातले 140 कोटी नागरिक तर व्यवस्था चालवू शकत नाही, म्हणून आपण स्थानिक पातळीपासून सर्वोच्च संसदेपर्यंत आपले प्रतिनिधी निवडतो, आणि त्यांना व्यवस्था चालवण्याचे अधिकार देतो.त्यांच्या मदतीला अभ्यासू, कार्यक्षम अशी प्रशासनव्यवस्था असते. पण निवडणूकांमध्ये मतदान करणे एवढीच आपली जबाबदारी आहे का? अर्थात, तेही अनेक लोक करत नाहीत, हा भाग वेगळा.Republic Day: Citizens will realize the responsibility that comes with power, it is Republic Day.

पण केवळ राजकीय क्षेत्रात आपले प्रतिनिधी पाठवणे एवढीच सर्वसामान्य, मायबाप जनतेची जबाबदारी असते का? राजकारण आणि निवडणुका या सगळ्यांच्या केंद्रस्थानी माणूस म्हणजे मतदार असला तरी प्रत्यक्षात तो या दोन्हीच्या परिघाबाहेर आपले वेगळे दैनंदिन आयुष्य जगत असतो. अशी सर्वसामान्य माणसे आपापल्या कार्यक्षेत्रात किती कर्तव्यांचे पालन करतात? आपल्या रोजच्या आयुष्यात आपण कितीदा आणि किती गांभीर्याने नियमांचे पालन करतो? आपल्या स्वतःच्या घराबाबत आपल्या मनात जी आत्मीयतेची, जबाबदारीची भावना असते ती आपले शहर, राज्य, देश अगदी आपली वसाहत यांच्याबद्दल का नसते? घर स्वच्छ राहावे म्हणून काळजी घेणारे आपण आपल्या देशाबद्दल इतके बेफिकीर का असतो?

घरातल्या कोणाला त्रास होऊ नये म्हणून काळजी घेणारे आपण जेव्हा वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करतो, तेव्हा आपली नागरिकत्वाची भावना कुठे जाते? रस्त्यावर कचरा टाकणे, थुंकणे अशा गोष्टी घडतात, कारण आपल्याला देशाविषयी ती भावना नसते, जी घराविषयी असते.
घरातल्या गोष्टींबद्दल अतिशय काळजीपूर्वक वागणारे आपण, राष्ट्रीय आणि सामाजिक संपत्तीचा वापर कसा करतो? आपला सार्वजनिक आयुष्यातला वावर पहिला तर आपल्याला साधे नागरी वर्तणुकीचे संस्कार नाहीत असे कोणीही म्हणेल.

आपल्यामुळे आपला देश अस्वच्छ होतो आहे, सार्वजनिक राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होत आहे, याबद्दल आपल्या मनात खंत नसणे आपल्या बेफिकीर वृत्तीचं निदर्शक आहे. ज्यादिवशी आपला देश हे आपलं घर आहे ही जबाबदारीची जाणीव सर्व नागरिकांमध्ये खोलवर रुजेल, त्यादिवशी भारतात खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक येईल. जेव्हा निवडणुका आणि राजकारणाच्या जगातून बाहेर पडत आपल्या समाजाची उन्नती हे आपलं कर्तव्य आहे ,हे आपल्याला समजत नाही, तोपर्यंत प्रजसत्ताक आले असे म्हणता येणार नाही.

या प्रजासत्ताक दिनी, आपण एक जबाबदार नागरिक म्हणून आपला देश स्वच्छ, सुंदर आणि जगण्यास योग्य आणि सुखकर बनवण्याचा निर्णय घेऊया.

ML/KA/PGB
26 Jan. 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *