मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासनाच्या वतीने देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी पॉलिट ब्युरो सदस्य कोबाद गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम‘ या पुस्तकास जाहीर झालेला २०२१चा अनुवादित प्रकारातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार रद्द करण्यात आला आहे. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र पाठक यांनी या पुरस्काराबाबत निषेध व्यक्त करणारे पत्रक प्रसिद्ध केले होते.
या पुस्तकाच्या निवडीसंदर्भात तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षांनी कुठलीही चर्चा केली नाही अथवा ही बाब निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे या सर्वच प्रकरणाच्या चौकशीचे आदेश मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत.
कोबाड गांधी हे केंद्र सरकारनं बंदी घातलेल्या माओवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी सदस्य होते. जवळपास दशकभर त्यांनी तुरुंगवास भोगला. तुरुंगवासातून सुटका झाल्यानंतर त्यांनी तुरुंगावासातील आठवणी ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम’ पुस्तकातून शब्दबद्ध केल्या. या पुस्तकाचा मराठी अनुवाद अनघा लेले यांनी केला. या अनुवादीत पुस्तकाला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार’ जाहीर होता. हाच पुरस्कार आता रद्द करण्यात आला आहे.
सरकारच्या या निर्णयाचे पडसाद साहित्य विश्वातही उमटताना दिसत आहेत. सरकारचा निषेध करत ‘भुरा’चे लेखक शरद बाविस्कर यांनी ‘लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार’ नाकारला आहे. प्रौढ वाङ्मय- आत्मचरित्र प्रकारासाठी बाविस्कारांना पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार बाविस्करांनी नाकारला आहे.
सरकारच्या निर्णयाचा निषेध करत लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान सचिवांना त्यांनी पत्र लिहून राजीनामा पाठवला आहे. ते पत्र त्यांनी फेसबुकवर शेअर केलं आहे.