भूमी अभिलेख (भूकरमापक) भरती २०२५ मधील रिक्त पदे भरण्यासाठी जागा वाढ प्रस्तावास तात्काळ मंजुरी द्यावी – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची मागणी
मुंबई, दि १३
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्याचे महसूल मंत्री मा. चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र देऊन भूमी अभिलेख (भूकरमापक) भरती २०२५ मधील रिक्त पदे भरण्यासाठी विभागीय आयुक्तांनी पाठविलेल्या “जागा वाढ (Vacancy Increase)” प्रस्तावास तात्काळ मंजुरी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
भूमी अभिलेख भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, राज्यभरातील हजारो उमेदवारांनी मोठ्या आशेने व मेहनतीने या भरती प्रक्रियेत सहभाग घेतला आहे. मात्र, अनेक जिल्ह्यांमध्ये मंजूर पदांव्यतिरिक्त अतिरिक्त रिक्त पदे उपलब्ध असूनही त्या संदर्भातील प्रस्तावावर अद्याप अंतिम निर्णय न झाल्यामुळे गुणवत्ताधारक व पात्र उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आणि नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी आझाद मैदान येथे आंदोलन केले.
विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या जागा वाढ प्रस्तावास तात्काळ मंजुरी द्यावी.
तसेच रिक्त पदे भरून पात्र उमेदवारांना न्याय द्यावा.
तसेच प्रतीक्षा यादीतील गुणवत्ताधारक उमेदवारांना रिक्त जागांवर प्राधान्याने संधी द्यावी.
तसेच भरती प्रक्रियेबाबत स्पष्ट व वेळबद्ध शासन निर्णय (GR) जाहीर करावा. भविष्यात मंजूर पदांवरील रिक्तता टाळण्यासाठी कायमस्वरूपी धोरण निश्चित करावे.
राज्यातील बेरोजगार तरुण अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणी व मानसिक तणाव सहन करत स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत. अशा परिस्थितीत शासनाने संवेदनशीलता दाखवत पात्र उमेदवारांना न्याय देणे आवश्यक असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने म्हटले आहे.मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास पात्र उमेदवारांच्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही देण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धनंजय शिंदे यांनी दिली.KK/ML/MS