कामगारांच्या लढ्यासाठी आम्ही नेहमीच तयार – आमदार भाई जगताप

 कामगारांच्या लढ्यासाठी आम्ही नेहमीच तयार – आमदार भाई जगताप

मुंबई, दि. २ ( केतन खेडेकर ) : केंद्र सरकारने कामगारांसाठी आणलेल्या चुकीचे कायद्याविरोधात लढण्यासाठी आम्ही सदैव तयार असून येणाऱ्या काळात या काळया कायद्याविरोधात जाहीर लढा उभारला जाणार असून कामगारांच्या लढासाठी आम्ही नेहमीच तयार असतो असे जाहीर प्रतिपादन भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस आमदार भाई जगताप यांनी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाने बांद्रा येथील रंगशारदा हॉल मध्ये आयोजित केलेल्या कामगार मेळाव्यात केले. ते पुढे म्हणाले आमची युनियन ही कोणा एकाची मक्तेदारी नाही. आमच्या युनियनमध्ये सव्वा सहा लाख कामगार हे सभासद असून कामगारांनी कामगारांसाठी चालवलेली ही युनियन आहे. या युनियनमध्ये जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा कामगारच होते. आमच्या युनियनने आजपर्यंत एकही संप केला नाही. व्यवस्थापन आणि कामगार यांच्याशी दुवा साधून आम्ही प्रत्येक कंपनीमध्ये करार केला आहे. कंपनीतील उत्पादन वाढले तरच कामगारांचे पगार वाढतील या ध्येय धोरणेने आमची युनियन काम करत आहे. मुंबई ही महाराष्ट्रात राहिली पाहिजे यासाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लढाई लढून 106 हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचा बलिदान देऊन हुतात्म पत्करलं. त्यात कामगार मोठ्या संख्येने होते त्यामध्ये 72 माथाडी कामगार होते. आज या केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कामगारांची युनियन कोणाच्या हातात द्यायची हे ते ठरवणार. ते कामगारांच्या बाजूने नाही तर मालकांच्या बाजूने निर्णय घेतात.याला आमचा जाहीर विरोध आहे आणि यापुढे देखील राहील.

आमदार भाई जगताप यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आमचे पक्ष जरी वेगळे असले तरी आमचा कामगाराप्रति असलेला दृष्टिकोन आणि ध्येय धोरण एकच आहे. कामगार ही आमची जात आहे आणि त्यांना न्याय देणे हा आमचा धर्म आहे. केंद्र सरकारने काश्मीरमधील 370 काढल्यामुळे आम्हाला वाटलं होतं की काहीतरी चांगलं होईल परंतु आज काश्मीरमध्ये त्यांचेच मित्र अदानी आणि अंबानी हे जमिनी खरेदी करतात. हे किती दुर्दैवी आहे यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. फिक्स टर्म आणि कंत्राटीकरणामुळे कामगार फार होरपळून गेला आहे. त्याला न्याय देण्यासाठी आणि या देशातील काळे कायदे जे चार संहिता कोड या सरकारने आणली आणले आहेत. त्यासाठी येणाऱ्या काळात आपल्याला फार मोठा लढा उभारावा लागेल. त्यासाठी मोठी कामगार चळवळ उभी करावी लागेल तरच कामगार टिकेल. मला आपण या ठिकाणी द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित केले त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो.असे जाहीर प्रतिपादन भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष, खासदार अरविंद सावंत यांनी आपल्या भाषणातून केले.

कामगारांवर गुलामगिरी राबवायचे षडयंत्र कधीच यशस्वी होणार नाही. तर आम्ही तुम्हाला उध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. हा देश चालवायची भूमिका कामगार घेतो. केंद्रातील दोन माणसे देश चालवू शकत नाही. आज देशातील दहा टक्के श्रीमंतांकडे 70 टक्के संपत्ती आहे. आज आपण कुठे चाललो आहे. याचा आपण विचार केला पाहिजे. आज या ठिकाणी माझ्या कार्याची दखल घेऊन मला भीष्माचार्य पुरस्कार दिला त्याबद्दल मी आमदार भाई जगताप आणि भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे मनापासून आभार मानतो असे जाहीर प्रतिपादन सीटू राज्य उपाध्यक्ष काँग्रेस डी एल कराड यांनी आपल्या भाषणातून केले.

2014 च्या आधी कामगार हिताय कामगार सुखाचे निर्णय व्हायचे. पण आज मालकाच्या बाजूने निर्णय होत आहेत. शिक्षण हक्क, रोजगार गॅरंटी,मनरेगा, तंटामुक्ती योजना असे सगळे कायदे काँग्रेसने आणले त्यामुळे लोकांना रोजगार मिळाला. आज काय परिस्थिती आहे. या सरकारमधील दोन माणसे देश विकतात आणि दोन उद्योगपती देश खरेदी करतात. त्यांनी आपल्याला धर्म नावाची अफूची गोळी खायला दिली आहे. ही गोळी आपण खाल्ल्यावर आपल्याला फक्त धर्म दिसतो त्यामध्ये हिंदू मुस्लिम ,ओबीसी एससी, दलित उच्चवर्णीय यामध्येच आपण अडकलोय आणि भांडतोय. यांनी कितीही देशातील बांधवांमध्ये भांडण लावायचा प्रयत्न केला तरी काँग्रेस त्याला कडाडून विरोध करेल आणि सर्वधर्मसमभावाची भूमिका घेऊनच काँग्रेस पुढे जाईल असे जाहीर प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी या ठिकाणी केले. या कार्यक्रमात आमदार भाई जगताप यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सदाभाई चव्हाण यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष दिलीप दादा जगताप, कोषाध्यक्ष एस.आर. सावंत, सुधाकर सावंत, अनंत जाधव यांनी विशेष मेहनत घेतली.
KK/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *