गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या सर्व प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय
मुंबई दि २५ : राज्यातील महत्त्वाच्या गोसीखुर्द प्रकल्प संदर्भातील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, मदत व मोबदला यासंबंधीचे प्रश्न शासनाच्या गांभीर्याने विचाराधीन असून, लवकरात लवकरच समग्र निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत दिली.
सभागृहात संजय मेश्राम यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना मंत्री जयस्वाल म्हणाले की, गोसीखुर्द प्रकल्पामुळे बाधित गावांमध्ये पुनर्वसन, मोबदला व अतिपूराच्या समस्यांबाबत अनेक मुद्दे समोर आले आहेत. काही गावांमध्ये धरणामुळे पाणी साचून राहण्याच्या तक्रारी देखील प्राप्त झाल्या असून, त्या सर्व बाबींचा शासन स्तरावर सखोल अभ्यास सुरू आहे.
पूर्वी भूमी संपादन व पुनर्वसन प्रक्रियेत काही निर्णय घेण्यात आले होते. त्यानंतर अहवालांच्या आधारे पुन्हा पुनर्वसनाचे मुद्दे समोर आले आहेत. त्यामुळे संबंधितांना “प्रकल्पग्रस्त” म्हणून पुनर्वसन करायचे की अन्य पर्यायी उपाययोजना करायच्या, याबाबत शासन योग्य तो निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुनर्वसन अनुदान व अंशतः पुनर्वसित गावांच्या प्रश्नांवरही शासन धोरणात्मक पातळीवर विचार करत आहे. याआधी काही प्रकल्पग्रस्तांना सुमारे २.९९ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. त्या संदर्भातील प्रलंबित प्रश्नांवरही सकारात्मक तोडगा काढण्यात आला असल्याचे मंत्री जयस्वाल यांनी नमूद केले.
मंत्री जयस्वाल पुढे म्हणाले की, “गोसीखुर्द प्रकल्पातील उर्वरित सर्व प्रलंबित प्रश्न सन्माननीय सदस्यांनी क्रमाने मांडावेत. पूर्वी जसे ऐतिहासिक निर्णय घेतले तसेच पुढेही सर्वांना न्याय देणारे सकारात्मक निर्णय शासन घेईल.”
यासंदर्भात प्रकल्पग्रस्त प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकाऱ्यांसोबत लवकरच विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असून, पुढील एक महिन्याच्या आत ठोस निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.ML/ML/MS