कोविड काळातील ९८ चित्रपटांना दिलासा; शासनमार्फत ४ कोटी ९० लाखाचा निधी वाटप
मुंबई, दि २४: दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजनेच्या अंतर्गत ऑक्टोबर २०२५ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत परीक्षण केलेल्या ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ श्रेणीतील ६५ चित्रपट आणि कोविड काळातील ९८ चित्रपटांना एकूण २४ कोटी १० लाख अर्थसहाय्य मंगळवारी वितरित करण्यात आले. त्यावेळी मुंबईत केवळ मराठीसाठी स्वतंत्र चित्रनाट्यगृह लवकरच उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिली.
दरम्यान ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईसह राज्यातील इतर भागांमध्ये टप्प्याटप्प्याने मराठी चित्रपटगृहांचे जतन आणि विकास करण्यात येणार आहे.
सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे आयोजित दर्जेदार चित्रपटांना अर्थसहाय्य योजनेचा धनादेश वितरण सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर व विविध चित्रपटाचे निर्माते यावेळी उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘श्यामची आई’ या चित्रपटास ७९ लाखांचा निधी वितरित करण्यात आला. तसेच अपर्णा हौसिंग, शीतल शेट्टी, स्नेहल तरडे या दिग्दर्शक महिलांना प्रत्येकी ५ लाखप्रोत्साहन निधी देऊन गौरविण्यात आले.
मंत्री अॅड.आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्र हा वैभव संपन्न व प्रतिभा संपन्न महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात कला, साहित्य, जागरूक नागरिक, उत्कृष्ट कलावंत या सगळ्याची पेरणी आहे. दर्जेदार मराठी सिनेमा निर्माण व्हावे यासाठी प्रत्येक टप्प्यावर सरकार आपले काम करत आहे. मराठी क्षेत्रातील निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शुद्ध हेतूने योजना कार्यान्वित करत असल्याचे श्री शेलार यांनी सांगितले. त्यामध्ये ‘अ’
दर्जासाठी 40 लाख ‘ब’ दर्जाचे चित्रपटांना 30 लाख क, दर्जाच्या चित्रपटांना दहा लाख अनुदान वाटप करण्यात येत आहे. यामध्ये सरकारी हस्तक्षेप नसावा यासाठी स्वतंत्र पारदर्शक प्रणाली असावी.चित्रपटाचे
परिक्षण करण्यासाठी 28 सदस्याची समिती गठीत करण्यात आली आहे. हे 28 सदस्य चांगल्या प्रकारे काम करत आहेत.
२०१८ ते २०२२ या कोविड काळात सर्व व्यवस्था ठप्प झाली होती. या कालावधीत निर्मात्याची गंभीर अवस्था झाली होती. या कालावधीतील सेन्सर प्राप्त चित्रपटांना ४ कोटी ९० लाख देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. चित्रपटाचे परीक्षण करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने २०२३ ते २०२६ या कालावधीमध्ये ४९६ चित्रपटाची परीक्षण केले आहे. या माध्यमातून मराठी चित्रपटांचा सार आपल्या समोर आणलेला आहे. त्यातून गुणवत्तापूर्ण चित्रपटांना चालना देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
मराठी सिनेमागृह , निर्माते यासाठी शूटिंगची व्यवस्था, त्यांना मिळणाऱ्या परवानग्या ,त्या परवानग्यामधील सुलभता ,त्याबरोबर लागणारी कौशल्य गुणवत्तेबद्दलचा प्लॅटफॉर्म गुणवते बरोबर लागणारे प्रशिक्षण व्यवस्था असे विविध कार्यक्रम शासनामार्फत राबवण्यात येत आहेत असेही मंत्री श्री. शेलार यांनी सांगितले.
मंत्री अॅड.आशिष शेलार म्हणाले की,मराठी चित्रपटसृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी चित्रपटगृहांची उभारणी, शूटिंगसाठी आवश्यक सुविधा, परवानग्यांमध्ये सुलभता, तसेच कलाकार आणि तंत्रज्ञांसाठी प्रशिक्षण व्यवस्था यावर विशेष भर देण्यात येत आहे. फिल्मसिटीच्या माध्यमातून प्रेक्षकांना दर्जेदार चित्रपट पाहण्याची सवय लागावी यासाठीही शासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
सांस्कृतिक कार्य व मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ किरण कुलकर्णी म्हणाले, प्रशासन किंवा फिल्मसिटी आणि निर्माते यांच्या संवादातूनच आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीसाठी काही चांगलं घडवता येणार आहे. संवादाचा एक भाग म्हणून आजच्या कार्यक्रमाचा उपयोग करावा, एआयचा जमाना येतो आहे, आणि पुढचा काळ झपाट्याने, झपाट्याने बदलतो आहे. या बदलत्या काळात निर्मात्यांना, मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांना, शासनाने काय मदत करावी याच्यावरती विचारमंथन होने गरजेचं आहे. कशा पद्धतीने शासनाने फिल्मसिटीला फॅसिलिटेट करावं, याबद्दलच्या आपल्या काही कल्पना असतील, बदलत्या काळानुसार, आमच्यापर्यंत पोहोचवावे ,असे अवाहन त्यांनी यावेळी केले.
आपली मराठी भाषा ही अतिशय चांगल्या पद्धतीने साहित्यनिर्मिती करते आहे, आपली मराठी भाषा कथांचं भांडार आहे, जगातल्या इतर कुठल्या भाषेमध्ये आढळणार नाही, असं कथांचं भांडार मराठी भाषेत आहे.आशयाच्या गुणवत्तेच्या बाबतीत आणखी प्रगती आणि पुढे जाणं आवश्यक आहे. त्याकडे निर्मात्यांनी, दिग्दर्शकांनी थोडं सजगपणे पाहणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
एन डी स्टुडिओ, कोल्हापूरची चित्रनगरी आहे, अतिशय सुंदर अशा पद्धतीची रचना आणि सुविधा तिथे उपलब्ध आहे.या ठिकाणी असलेल्या सुविधांचा जास्तीत जास्त उपयोग निर्मात्यांनी घ्यावा ,असे आवाहन त्यांनी निर्मात्यांना केले .KK/ML/MS