शैक्षणिक धोरणांवर भर; आयआयटी पवई येथे केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची भेट
मुंबई, दि. २३ – भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत देशातील शिक्षणव्यवस्थेला अधिक सक्षम, समावेशक आणि भविष्योन्मुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली.
भेटीदरम्यान राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसह उच्च शिक्षणातील गुणवत्ता वाढ, कौशल्याधारित शिक्षण, तसेच संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्याबाबत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उद्योग-संलग्न अभ्यासक्रम आणि स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

यावेळी खा. संजय दिना पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणासोबतच कौशल्यविकास, रोजगाराभिमुख प्रशिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील संधी वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता व्यक्त केली. ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक दरी कमी करून सर्व विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देण्यावरही त्यांनी लक्ष वेधले.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही शिक्षण क्षेत्रात नवे उपक्रम राबविण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत, उच्च शिक्षण संस्थांमध्ये नवोन्मेषी उपक्रमांना प्रोत्साहन देण्यावर भर दिला. तसेच, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
ही भेट उच्च शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक निर्णयांना गती देणारी ठरणार असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सकारात्मक पाऊल असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.ML/ML/MS