वनविभाग मासांहारी प्राण्यांना अधिवासातच देणार पुरेशी शिकार
मुंबई, दि. 20 : जंगलतोडीमुळे नैसर्गिक अधिवास धोक्यात आल्याने आणि पुरेशा शिकारी अभावी वाघ, बिबट्यांसारखे मांसाहारी प्राणी आता मानवी वसाहतीमध्ये राजरोस फिरू लागले आहेत. यामुळे दिवसेंदिवस मानव-प्राणी संघर्ष वाढत चालला आहे. यावर उपाय म्हणून आता वनविभागाने मासांहारी प्राण्यांना त्यांच्या अधिवासातच पुरेशी शिकार उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी आज एका पत्रकार परिषदेत सांगितले की, वाघ व बिबट्या यांसारख्या मांसाहारी प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुरेशा प्रमाणात शिकार उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामध्ये माकडं, ससे, रानडुक्कर तसेच गुरं यांचा समावेश असेल. यामुळे हे शिकारी प्राणी अन्नाच्या शोधात शहरी भागात येणार नाहीत आणि मानवी संघर्ष टाळता येईल.
नाईक यांनी स्पष्ट केले की, गेल्या काही वर्षांत वाघ व बिबट्यांची संख्या चौपट वाढली आहे. त्यामुळे त्यांच्या अन्नसाखळीची गरज पूर्ण करण्यासाठी वन विभागाने नैसर्गिक शिकार प्रजातींचा आधार निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. वनमंत्री म्हणाले, “राज्यातील जंगलांमध्ये मांसाहारी प्राण्यांसाठी नैसर्गिक शिकार उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे हे प्राणी जंगलातच राहतील आणि मानवी वस्त्यांमध्ये येणार नाहीत.” यावेळी त्यांनी वन विभागाच्या सकारात्मक प्रतिमेसाठी पुढील तीन महिन्यांत विविध विकासात्मक उपाययोजना राबविण्याची घोषणाही केली.
SL/ML/SL