श्रेष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांना स्वरांजली, “सोळावं वरीस धोक्याचं”

 श्रेष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांना स्वरांजली, “सोळावं वरीस धोक्याचं”

मुंबई दि. १२ मार्च – : महाराष्ट्राच्या लावणी परंपरेला नवे आयाम देणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने “सोळावं वरीस धोक्याचं – अजरामर लावण्यांचा स्वरोत्सव” हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, १३ मार्च २०२६ रोजी रात्रौ ८:३० वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले (पूर्व), मुंबई येथे संपन्न होणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टी आणि लोकसंगीताच्या क्षेत्रात सुलोचना चव्हाण यांनी आपल्या दमदार आवाजातून लावणीला वेगळे स्थान मिळवून दिले. “सोळावं वरीस धोक्याचं”सारख्या अजरामर लावण्यांमुळे त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या गायकीतून लावणीच्या परंपरेला नवी ओळख मिळाली आणि मराठी सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध झाला. त्यांच्या स्मरणार्थ आयोजित हा स्वरोत्सव मराठी लोकसंगीताच्या परंपरेचा गौरव करणारा ठरणार आहे.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका संपदा माने आणि संज्योती जगदाळे या आपल्या सुरेल आवाजातून सुलोचना चव्हाण यांच्या अजरामर लावण्यांना स्वरांजली अर्पण करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध निवेदक परेश दाभोळकर करणार असून संगीत संयोजन प्रशांत लळित यांचे असणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

या स्वरोत्सवासाठी विनामूल्य प्रवेशिका ११ मार्चपासून मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहावर उपलब्ध आहेत. मुंबई व परिसरातील नागरिक, संगीतप्रेमी आणि लावणी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या अजरामर लावण्यांच्या स्वरोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे.ML/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *