सुनेत्रा पवारांनी महिलांसाठी सुरू केली विशेष सवलत
मुंबई, दि. १० : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने विधान परिषदेत महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली. मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ (लवकर या-लवकर जा) ही विशेष योजना लागू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या योजनेअंतर्गत मुंबई महानगरातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांना सकाळी ९.१५ ते ९.४५ या वेळेत कार्यालयात लवकर येऊन जितक्या मिनिटांनी आधी काम सुरू करतील, तितक्याच मिनिटांनी संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघता येणार आहे. यामुळे साधारणपणे ३० मिनिटांची सवलत मिळणार आहे.
सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. महिलांना योग्य सन्मान, संधी आणि सुरक्षित वातावरण देणारा समाज घडवण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. या योजनांमुळे महिलांना अधिक सक्षम आणि स्वावलंबी बनवण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.