वाशी, ऐरोली, मुलुंड नाक्यांवर प्रवेशद्वार आणि सर्व सुविधायुक्त संकुल उभारणीच्या दृष्टीने महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केली स्थळ पाहणी

 वाशी, ऐरोली, मुलुंड नाक्यांवर प्रवेशद्वार आणि सर्व सुविधायुक्त संकुल उभारणीच्या दृष्टीने महापौर श्रीमती रितू तावडे यांनी केली स्थळ पाहणी

मुंबई, दि १०
मुंबई महानगरात प्रवेशाच्या मार्गावर, मुंबईची ओळख सांगणारे संकल्पना आधारित असे प्रवेशद्वार आणि घड्याळ मनोरा उभारणीला वेग देण्याच्या दृष्टीने वाशी नाका, ऐरोली नाका आणि मुलुंड नाका या तीन ठिकाणी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांनी आज (दिनांक १० मार्च २०२६) सकाळी भेट देवून प्रत्यक्ष जागांची पाहणी केली. प्रवेशद्वार ही केवळ कमानी पुरती मर्यादित संकल्पना नसून त्या सोबतीला सर्व नागरी सेवा-सुविधा युक्त संकुल विकसित करणे, त्यातून नागरिकांना आणि पर्यटकांना सर्व सुविधा मिळवून देणे तसेच महानगरपालिकेचा महसूल वाढवणे हा देखील उद्देश आहे. त्यादृष्टीने कालबद्ध आखणी करून प्रशासनाने कामकाजाला लागावे. या प्रकल्पाला गती देण्यासाठी लवकरच सर्व संबंधित खात्यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, असे या दौऱयावेळी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी नमूद केले.

प्रारंभी, वाशी नाका, त्यानंतर ऐरोली नाका आणि अखेरीस मुलुंड नाका या ठिकाणी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी पाहणी केली. याप्रसंगी त्या म्हणाल्या की, यापूर्वी दहिसर नाका येथे पाहणी दौरा केला होता. त्यानंतर आज या तिन्ही ठिकाणी पाहणी केली आहे. मुंबईतील चारही प्रवेश मार्गांवर प्रवेशद्वार आणि घड्याळ मनोरा उभारावयाचा आहे. पण ही संकल्पना फक्त कमानी उभारण्यापुरती मर्यादित नाही. मुंबईमध्ये प्रवेश करणारे नागरिक, अभ्यागत, पर्यटक यांना या प्रवेशद्वारांमधून मुंबईची ओळख जाणवली पाहिजे. त्यामुळे हे सर्व प्रवेशद्वार मुंबईशी संबंधित सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक इत्यादी संकल्पनांवर आधारित असतील. तसेच या प्रवेशद्वारांच्या आजूबाजूला हरितक्षेत्र आणि उद्याने, वाहनतळ सुविधा, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र आणि वातानुकूलित प्रसाधनगृह, विश्राम कक्ष, त्याचप्रमाणे कोळी बांधव आणि महिला बचत गट आदींना आणि इतर व्यावसायिकांना दालन थाटता येईल अशी जागा, डिजिटल होर्डिंग त्याचप्रमाणे सौरऊर्जा प्रकल्प असे सर्व समावेशक संकुल (हब) निर्माण करावयाचे आहे. या संकुलाच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिकेला कायमस्वरूपी महसूल प्राप्त होईल, हा देखील यामागचा उद्देश आहे, असे महापौरांनी नमूद केले. सर्व ठिकाणी स्थळ पाहणी पूर्ण झाली असून आता प्रस्ताव तयार करून त्याला गती देण्यासाठी सर्व संबंधित खात्यांची लवकरच बैठक आयोजित करणार आहे. कालबद्ध आखणी करून हा प्रकल्प पूर्ण करावयाचा आहे. त्यामुळे सर्व संबंधित खात्यांनी आपापल्या संकल्पना आणि परिपूर्ण माहितीसह उपस्थित रहावे, असे निर्देशही महापौर श्रीमती रितू तावडे यांनी यावेळी दिले.

सहआयुक्त (परिमंडळ ५) श्री. देविदास क्षीरसागर, उपआयुक्त (उद्याने) श्री. अजितकुमार आंबी, महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कांदळवन कक्ष) श्री. एस. व्ही. रामाराव, एम पूर्व विभागाचे सहायक आयुक्त श्री. उज्ज्वल इंगोले, टी विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती योगिता कोल्हे यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग आणि सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी या पाहणी दौऱयास उपस्थित होते.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *