पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधील ९०% Tour Booking रद्द

 पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधील ९०% Tour Booking रद्द

नवी दिल्ली,दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : काश्मीरमध्ये पर्यटकांवर काल झालेल्या भीषण हल्ल्यात अनेकांना नाहक प्राण गमवावे लागले आहेत. या परिस्थितीत आता नुकत्याच सावरू लागलेल्या काश्मीरच्या पर्यटन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. उन्हाळी सुट्टयांनिमित्त काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांनी आता बुकींग रद्द करण्यास सुरुवात केली आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, दिल्लीतील अनेक ट्रॅव्हल एजन्सींनी आज सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांनी जम्मू आणि काश्मीरसाठी केलेले जवळपास ९० टक्के बुकिंग रद्द केले आहेत.

कनॉट प्लेसच्या आऊटर सर्कलमधील शंकर मार्केटमध्ये असलेल्या स्वान ट्रॅव्हलर्स या कंपनीचे मालक गौरव राठी म्हणाले की, सुमारे २५ लोकांनी बुकिंग रद्द करण्याची विनंती केली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, अनेक पर्यटकांनी मे महिन्यात काश्मीरला भेट देण्याची योजना आखली होती आणि आता ते रद्द करण्याची विनंती करत आहेत.

हॉटेल असोसिएशन काश्मीरचे अध्यक्ष वाहीद बजाज खारा म्हणाले की, आम्ही सर्वजण काश्मिरी पर्यटकांसोबत आहोत. हा एक अतिशय दुःखद प्रसंग आहे. काश्मीरमधील प्रत्येक घर रडत आहे. आम्ही काश्मीर बंदची घोषणा केली आहे. गेल्या ३५ वर्षांत काश्मीरमधील पर्यटकांसोबत असे कधीच घडले नाही. भविष्यातही असे घडू नये.

२०१९ मध्ये कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर तेथे पर्यंटकांचा ओघ वाढला. मात्र त्यानंतर लगेचच कोविडमुळे पर्यटनाला फटका बसला होता. २०२१ पासून परिस्थितीत सुधारणा झाली होती. गेल्या वर्षी पर्यटनामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला मोठा फायदा झाला होता. मात्र आता पुन्हा दहशतवादी कारवाईमुळे काश्मीरच्या विकासाला खीळ बसणार आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील काही नामांकीत पर्यटक कंपन्यांनी काश्मीरचे बुकींग रद्द करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. या हल्ल्यनंतर काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात असून तेथील पर्यटन सुरळीतपणे सुरू आहे. त्यामुळे काश्मीरच्या नियोजित टूर रद्द होणार नाहीत, केंद्र सरकारकडून अधिकृत सूचना मिळेपर्यंत काश्मीरमधील नियोजित दौरे थांबवण्यात येणार नाहीत, असा निर्णय नामांकित पर्यटन कंपन्यांसह अन्य पर्यटन व्यावसायिकांनी घेतला आहे. सध्या तिथे असलेल्या पर्यटकांची टूर सुरक्षितपणे होईल, याबाबत आम्ही दक्ष आहोत, असेही पर्यटन व्यावसायिकांनी स्पष्ट केले आहे.

हल्ल्यामुळे पर्यटकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होणे साहजिक आहे, मात्र त्यांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या मनातील भीती कमी करून नियोजित टूर्सचा आनंद त्यांना कसा घेता येईल यादृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत’, असे ‘केसरी टूर्स’चे शैलेश पाटील यांनी सांगितले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *