खारपाणपट्ट्यातील पाणी गोड करण्याचा प्रकल्प यशस्वीतेकडे….

अमरावती, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील बोराळा येथे पूर्णा नदीच्या खारपाण पट्ट्यातील खाऱ्या पाण्याचे गोड्या पाण्यात रुपांतर करण्याच्या ऐतिहासिक प्रयोगाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज प्रकल्पाला भेट दिली. खाऱ्या पाण्याला गोड पाण्यात रूपांतर करणारा हा पहिला प्रायोगिक प्रयत्न असून या प्रयोगामुळे अमरावती, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्यातील 950 गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे, या प्रकल्पाला प्रायोगिक तत्वावर शासनाने दीड कोटी रुपये दिले आहेत. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर या तीन जिल्ह्यांमध्ये साडेनऊशे अशा प्रकारचे प्रकल्प उभारून हा जिल्हा खारपाण मुक्त होईल असे नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पामुळे जमिनीपासून केवळ काही फुटांवर गोड पाणी उपलब्ध होऊ शकणार आहे.खारपाण पट्ट्यातील खाऱ्या पाण्यामुळे जामीन ओलित करणे शक्य नव्हते मात्र या प्रकल्पामुळे आता खारपण पट्यातील शेतकरी वर्षांला 2 ते 3 पिके घेऊ शकणार आहे. खाऱ्या पाण्यातील झिंग्यांना बाहेर देशात मोठ्या प्रमाणात मागणी होत असून या ठिकाणी शेतकऱ्यांनी झिंग्याच्या शेतीवर भर द्यावी त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी 50 लाख रुपयाचे उत्पादन होणार आहे. त्या बाबतीत मत्स्य विकासमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सुद्धा पत्र दिले असून या ठिकाणी तलाव बांधून खाऱ्या पाण्यातील झिंगे तयार झाले तर संपूर्ण जगात एक्स्पोर्ट करता येतील आणि येथील शेतकरी समृद्ध होईल असे यावेळी गडकरी यांनी सांगितले. यावेळी खासदार डॉ अनिल बोंडे,खासदार नवनीत राणा व विभागीय आयुक्त उपस्थित होते.
ML/KA/PGB 11 Jun 2023