राज्यातील या चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

 राज्यातील या चार जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिवाळा आणि अवकाळी पाऊस हे हवामानाचे समीकरण आता दरवर्षीच दिसून येत आहे. डिसेंबरमहिना संपून जानेवारीमध्य़े थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली की अगदी फेब्रुवारी अखेर पर्यंत अधुनमधुन ढगाळ हवामान आणि मागोमाग येणाऱ्या पावसाने राज्यभरातील शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडते. चालू आठवडा हा अशाच खराब हवामान स्थितीचे द्योतक आहे. राज्यातील काही भागात कालापासून ढगाळ हवामान आहे. तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीही पडल्या. हवामान विभागाने आज अकोला, अमरावती, बुलडाणा आणि नागपूर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्टही दिला.

तर सिंधुदूर्ग, रत्नागिरी, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या पावसाचा अंदाजही हवामान विभागाने दिला. रविवारीही रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, नाशिक, नगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. सोमवारी धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी विजा, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज दिला. तर कोकण, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, नागपूर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. तर मंगळवारी नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी विजा, ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला.

रब्बीचे पिक हातातोंडाशी आलेले असताना पावसाची ही टांगती तलवार समोर उभी ठाकल्याने राज्यभरातील शेतकरी वर्ग चिंतेच्या छायेत आहे. आधीच परतीचा मान्सून उशीरापर्यंत रेंगाळल्यामुळे रब्बी पिकांच्या पेरणीला उशीर झाला. काही ठिकाणी पावसामुळे रब्बी पिकाची पुरेशी पूर्व तयारी न झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पिक पेरणी टाळली आहे.त्यातच आता रब्बी पिक असलेल्या क्षेत्रावर हे अवकाळीचे संकट कोसळ्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच आत्ताचा कालावधी हा संत्री, मोसंबी, द्राक्ष, अंजिर या फळपिकाच्या काढणीचा असल्यामुळे फळ उत्पादक शेतकरी देखील धास्तावले आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *