जागतिक रंगभूमी दिन : रंगभूमीत काळानुरूप बदल करत ती लोकप्रिय करण्याची गरज

राधिका अघोर
२७ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९६१मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. १९६२ साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता.
भारताला तर नाट्यशास्त्राची प्राचीन परंपरा आहे. भरतमुनी भारतीय नाट्यशास्त्राचे जनक मानले जातात. नाट्यकला सुरुवातीपासून भारतात लोकप्रिय होती. पूर्वी आजच्यासारखे रंगमंच नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्यासारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली. वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत तसेच कोकणातील दशावतारी नाटके,तमाशा, बहुरुपी, वीरकथा, देवासुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाट्यकला जन्मास आली.
मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून पोवाडा, भारुड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती. त्यानंतर ‘नाटक’या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली. शेकडो प्रेक्षकांच्या समोर आपली कला, अभिनय सादर करणे, जिवंत पात्र जगणे आणि अत्यंत मर्यादित नेपथ्य असताना एका वेगळ्या कथेच्या जगात प्रेक्षकांना घेऊन जाणे, ही सोपी गोष्ट नाही. प्रेक्षकांना खिळवून ठेवणे ही तर अधिकच कठीण कला आहे.
ही कला ज्याला साधते, तो रंगभूमी गाजवू शकतो. मात्र त्यात सातत्यही हवे. जिथे समाज अधिक प्रगल्भ, अधिक सुसंस्कृत असतो, तिथे नाट्यकला अधिक लवकर बहरते.महाराष्ट्र, बंगाल अशा साहित्य संस्कृतीची परंपरा असलेल्या राज्यात, नाटकांनाही रसिकांनी दाद दिली, प्रेम दिलं.
विष्णूदास भावे यांच्या ‘सीता स्वयंवर’ या नाटकाचा १८४३ मध्ये सांगलीत पहिला प्रयोग सादर करण्यात आला, ती महाराष्ट्रात नाट्य कलेची औपचारिक सुरूवात. त्यानंतर मराठी रंगभूमीने वेगवेगळी वळणे घेतली. त्यातील एक महत्त्वूर्ण वळण म्हणजे संगीत रंगभूमी. मराठी रंगभूमीवर सादर झालेली संगीत नाटके मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ होता. त्यानंतर ऐतिहासिक, सामाजिक विषयावरची नाटके, लोकप्रिय झालीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संन्यस्तखड्ग सारख्या नाटकांनी समाजजागृतीही केली. महात्मा फुले यांनीही सामाजिक क्रांती आणणारी नाटके लिहिलीत.
या नंतरच्या काळात वसंत कानेटकर, शिरवाडकर यांची समाजप्रबोधनपर नाटके, आणि विजय मेहता, विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, रत्नाकर मतकरी यांची वास्तववादी, क्रांतिकारक नाटके अशा सगळ्या नात्यपरंपरेतून मराठी नाट्यसृष्टी अधिकाधिक प्रगल्भ, परिपक्व होत गेली आहे. विनोदी नाटकांचीही महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे. अत्यंत दर्जेदार अशा विनोदी नाटकांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. प्रशांत दामले, विजय कदम, लक्ष्मीकांत बेर्डे आणि नंतर भरत जाधव यांनी ती परंपरा पुढे नेली. चंद्रकांत कुलकर्णी यांनी नाटक लोकप्रिय केलं. झाडीपट्टी नाटक ही एक वेगळी सांस्कृतिक परंपरा आहे.
आजही महाराष्ट्रात नाटकांना प्रेक्षकांची पसंती आहे . विशेषतः पुण्या मुंबईत मराठी नाटकांचे शो आजही हाऊसफुल होतात. मात्र त्यांचं प्रमाण कमी झालं आहे. आधी चित्रपट, त्यानंतर खासगी दूरचित्रवाहिन्या आणि आता स्मार्ट भ्रमणध्वनी, इंटरनेट, संगणक यांच्या आक्रमणामुळे नाटक टिकणार का? अशीही शंका रसिकांच्या मनात येत आहे. सध्याची तरुणाई ही स्मार्टफोन, फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम यात गुरफटलेली आहे. त्यामुळे नाटकांकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र नाटकांनी कालबाह्य न होता, या सर्व माध्यमांकडे शत्रू म्हणून न पाहता मित्र म्हणून पाहून त्याचा मराठी नाटकांच्या प्रसिद्धीसाठी आणि तरुणाईला मराठी नाटकांकडे वळविण्यासाठी अधिकाधिक उपयोग करून घेण्याची गरज आहे. मराठी नाटके अनुवादित स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. तर ही नाट्यकला महाराष्ट्राबाहेर ही पोहोचेल.
नाटक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचे अधिक प्रयोग व्हायला हवेत. ते प्रयोग सादर करणं नाट्यनिर्मात्यांना परवडेल, आणि सर्वसामान्य नाट्य रसिकांना ते प्रयोग बघणं परवडेल, यासाठी त्यांच्या तिकिटांचे दर कमी ठेवण्यात सरकारने अनुदानाच्या स्वरूपात मदत करायला हवी. तरच रंगभूमी टिकेल आणि आणखी बहरेल. समृद होईल.
जागतिक रंगभूमी दिनाच्या सर्वं कलाकारांना आणि रसिक प्रेक्षकांना शुभेच्छा !
World Theatre Day