नाशिकमध्ये रानभाजी महोत्सव आणि शेतमाल विक्री केंद्र

मुंबई, दि. ३० :– नैसर्गिक, पौष्टीक, औषधी गुणधर्माच्या रानभाजींचा महोत्सव आणि शेतमाल विक्री केंद्राचे उदघाटन केले जाणार आहे. नाशिकमधील उंटवाडी रोडवरील रामेतीच्या आवारात येत्या रविवारी ०३ ऑगस्ट रोजी स.१० वाजता कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.
नाशिक जिल्हयातील रानभाज्यामध्ये करवंदे, गुळवेल, कडुकंद, चाईचा मोहोर, सुरण यांचा, तर हिरव्या भाज्यांमध्ये तांदुळजा, काठेमाठ, कुडा, टाकळा, कोरला, कुई, घोळ, आळु, खुरसणी, तोंडली, लोथ यांचा समावेश होतो. आपल्या आरोग्यामध्ये सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे. त्यात विविध भाज्यांचा समावेश असतो. जंगल आणि शेतशिवारात नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानपालेभाज्या, फळभाज्या, कंद, शेंगा यांच्यामध्ये शरीरास आवश्यक असलेले अन्नघटक व औषधी गुणधर्म असतात. त्यांचे आरोग्यविषयक महत्व आणि माहीती शहरी भागातील नागरीकांना व्हावी. तसेच विक्री व्यवस्था करुन आदिवासी शेतकरी बांधवांना आर्थिक फायदा व्हावा याची जनजागृती करण्यासाठी रानभाजी महोत्सव आयोजित केला आहे.
शेतमाल विक्री केंद्र
शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री केंद्र हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी एक मजबुत पर्याय ठरणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल. सामाजिक व आर्थिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या फायदेशीर ठरणारा शेतमाल विक्री केंद्र रामेती संस्थेच्या आवारात प्रत्येक शनिवारी सुरु करण्याचे नियोजित आहे. नाशिकरांनी रानभाजी महोत्सव आणि शेतकरी ते ग्राहक थेट शेतमाल विक्री केंद्रास भेट द्यावी. रानभाज्या आणि शेतमाल खरेदी करुन आपल्या आहारात समावेश करावा. उपलब्ध रानभाज्यांच्या पाककृतींचा आस्वाद घ्यावा असे आवाहन कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांच्यामाध्यमातून कृषि विभागाने केले आहे.
ML/ML/SL