मोदी सरकारमध्ये नव्या पाणबुड्यांना अजूनही मंजुरी का नाही ?

मुंबई दि ५– धक्कादायक बाब म्हणजे भारतीय नौदलाकडे असलेल्या एकूण पाणबुड्यांपैकी जवळपास १५ पाणबुड्यांचे आयुष्य हे आता केवळ ७ ते ८ वर्षापर्यंतच मर्यादित आहे. याशिवाय ३ ते ४ पाणबुड्या पुढील ५ वर्षात निवृत्त कराव्या लागतील अशा अवस्थेपर्यंत पोहोचल्या आहेत. मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून एकही पाणबुडी निर्मिती वा खरेदीचा निर्णय घेतलेला नाही, हे खरे आहे का? याचा
खुलासा मोदी सरकार का करीत नाही असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते माजीआमदार अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.

भयानक म्हणजे, २०२३ च्या जुलैमध्ये पंतप्रधान मोदींच्या फ्रांसभेटीनंतर ३ स्कॉर्पीन प्रकारच्या पाणबुड्यांचा करार झाल्याचे मोदी सरकारतर्फे घोषितही केले गेले होते. ३० हजार कोटीच्या माझगाव डॉक सोबत झालेल्या करारास वर्ष उलटले तरीही केंद्रीय अर्थ खात्याने अजूनही मंजुरी
दिलेली नाही, हे ही खरे की खोटे ? याचा खुलासा मोदी सरकारने करावा अशी मागणीही गाडगीळ यांनी केली आहे.
प्रचाराचा भपका करण्यात तरबेज असलेल्या मोदींच्या थाळीसरकारमध्ये सीमेचे रक्षण करणाऱ्या सैन्याच्या युद्धसामुग्रीसाठी वर्षानुवर्षे मंजुरीच मिळत नाही हे वरीलबाबीतून सिद्ध होते अशी
खरमरीत टीका गाडगीळ यांनी केली आहे.
स्व. इंदिराजींच्या सरकारच्या काळात बॅ. विठ्ठलराव गाडगीळ संरक्षण उत्पादन मंत्री असताना अवघ्या २ वर्षात माझगाव डॉकने ३ फ्रिगेट्स व १ पाणबुडीचे जलावतरण केले होते याकडेही अनंत गाडगीळ यांनी लक्ष वेधले आहे.